मुख्यमंत्र्यांनी गतकाळी केलेल्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना भरीव मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:36+5:302021-06-02T04:14:36+5:30
रावेर : सन २०१९ मध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपद्ग्रस्त फळबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये, तर तत्कालीन ...

मुख्यमंत्र्यांनी गतकाळी केलेल्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना भरीव मदत करावी
रावेर : सन २०१९ मध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपद्ग्रस्त फळबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये, तर तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिहेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची सरकारकडे मागणी केली होती. आम्ही तशी कोणतीही मागणी करीत नसलो तरी सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शब्दाला जागून १०० टक्के उद्ध्वस्त झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तगविण्यासाठी भरीव मदत करावी, अशी मागणी पाहणी दौरा आटोपून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन करणार असल्याचे प्रतिपादन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले. मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील वादळी पावसात भुईसपाट झालेल्या केळीच्या बागांची पाहणी आटोपून तांदलवाडी येथील रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
रावेर तालुक्यातील विटवे, निंबोल, ऐनपूर, सुलवाडी, कोळदा, धामोडी, वाघाडी शेत शिवारातील वादळी पावसात भुईसपाट झालेल्या केळीच्या बागांचे नुकसान व उभय गावातींल उघड्यावर पडलेल्या आपद्ग्रस्त लोकांचा संसार पाहताना त्यांच्याशी संवाद साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.
निंबोल येथील नेहमीच्या नुकसानीकडे वेधले लक्ष
या पाहणीदरम्यान निंबोल येथील शेतकऱ्यांनी ७० टक्के शेती क्षेत्र दरवर्षी तापीच्या महापुरातील बॅक वॉटरमध्ये बुडीत होऊन नुकसान होत असल्याने ते कायमचे भूसंपादित करावे, अन्यथा २७ वर्षांपासूनची नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी करीत विमाधारक नसलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. दरम्यान, निंबोल येथील मसाकाचे व्हा. चेअरमन भागवत पाटील यांनी फळ पीक विमा योजनेतील मागील संरक्षित विम्यासह नुकसानभरपाई मिळण्याची मागणी करून फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याला नवसंजीवनी देण्याची मागणी केली.
दरम्यान, सुलवाडी, कोळदा व धामोडी तथा वाघाडी शिवारात केळीच्या नुकसानीची व घरांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने केळीच्या बागा उपटून नव्याने लागवड केलेल्या बागा ऐन कापणीवर आल्या असताना जमीनदोस्त झाल्याने दुहेरी फटका बसल्याने आपण सरकारकडे हिंमत लावाल तर केळी उत्पादक शेतकरी उभा राहू शकेल, अशा व्यथा आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या. केळी फळ पीक विमा कंपनीकडून अद्यापपावेतो पंचनामा होत नसल्याने नुकसान झालेली केळीचे खोडे बांधावर फेकून व लागवडपूर्व मशागतीला अडचणी येत असल्याचे काही शेतकऱ्यांनी ध्यानात आणून देताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे व तालुका कृषी अधिकारी एम. जी. भामरे यांना विमा कंपनीला तत्काळ सूचना देण्याचे स्पष्ट केले.
यावेळी मुख्य पदाधिकाऱ्यांसह माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजप किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, कृउबा सभापती श्रीकांत महाजन, पं. स. सभापती कविता कोळी, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग, भाजपचे प्रल्हाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शहराध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक यशवंत दलाल आदींची उपस्थिती होती.
फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाने एकास उडविल्याने गंभीर जखमी
फडणवीस यांच्या शासकीय दौऱ्यातील वाहनांचा ताफा निंबोलकडून ऐनपूरकडे जात असताना ऐनपूर गावालगत एकाला ताफ्यातील वाहनाची धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उतरून बघ्यांना त्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
गिरीश महाजन फोटोत मावत नाहीत...
ऐनपूर शेतकऱ्यांनी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना गिरीश महाजन यांना फोटोसाठी नजीक बोलावले असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन आता फोटोत मावत नसल्याची कोपरखळी हाणल्याने एकच हशा पिकला.