जैन धर्मीयांच्या चातुर्मासाला २३ जुलैपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:24+5:302021-07-21T04:13:24+5:30
चातुर्मासामुळे मुनी श्रींचा, महाराजांचा, माताजींचा, सतीया जींचा आदी तपस्वींची मंगल विहार पदयात्रा थांबणार आहे. तपस्वी ज्या स्थळी असतील,. ...

जैन धर्मीयांच्या चातुर्मासाला २३ जुलैपासून प्रारंभ
चातुर्मासामुळे मुनी श्रींचा, महाराजांचा, माताजींचा, सतीया जींचा आदी तपस्वींची मंगल विहार पदयात्रा थांबणार आहे. तपस्वी ज्या स्थळी असतील,. त्या स्थळी वर्षा योग किंवा वरुण योग अर्थात चातुर्मास स्थापना करतील, अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धिप्रमुख व खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन यांनी दिली. चार महिने एकाच ठिकाणी तपस्वींचे वास्तव्य राहणार असून त्यास वर्षा योग अर्थात चातुर्मास म्हणतात. असाच योग खान्देशातील कुसुंबा येथे सोळा वर्षानंतर चातुर्मासाचा लाभ मिळणार आहे.
हजारो मैल पदयात्रा करत तपस्वी सम्राट दिगंबर आचार्य सुनील सागरजी महामुनी श्री यांचे परमशिष्य प. पू. सुदेह सागरजी महाराज यांचे कुसुंबा नगरीत आगमन झाले. त्यांचा चातुर्मास स्थापना दि. २५ जुलै रोजी प्रथा परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. चार महिने तपस्वी एकाच ठिकाणी वास्तव्याला राहत असल्याने चातुर्मासाचे औचित्य साधून आध्यात्मिक मार्गदर्शन करीत असतात. हजारो शिक्षक मिळून जे काम होऊ शकत नाही, ते काम तपस्वी साधूंच्या मार्गदर्शनाने तसेच संगत गुणाने सहज होते. वर्षायोगाच्या काळात समाजात एक नवीन प्रेरणा जागृत होते. ज्या गावात, ज्या शहरात, जिथे जिथे चातुर्मास सुरू होतो, तिथे तिथे वातावरणात एक आगळे-वेगळे चैतन्य निर्माण होते.
बालकांमध्ये नैतिकता व सद्गुणांचे बीज पेरले जाते. वृद्धांमध्ये विरक्त व संन्यासाची भावना जागृत होते. युवक वर्ग व्यसनांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतो. आत्मिक तपस्या वृद्धिंगत करण्यासाठी चातुर्मास फार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्या चार महिन्याच्या कालावधीत साधू महात्म्यांचा सहवास राहिल्याने अनेक जणांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून येते. पूज्य श्रींच्या सानिध्यात पंकज नगिनदास जैन यांच्यातर्फे मंदिरात दिनांक १६ जुलै ते २३ जुलैपर्यंत विश्वशांती महायज्ञ व सिद्ध चक्र महामंडल विधान महापूजा संपन्न होत आहे.