थोडक्यात बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:01+5:302021-05-26T04:17:01+5:30
जळगाव : पद्मालय विश्राम गृहासमोर ठेवण्यात आलेली कचराकुंडी वेळेवर उचलण्यात येत नसल्यामुळे, कचरा ओसंडून वाहत आहे. त्यात पाळीव प्राण्यांनी ...

थोडक्यात बातम्या
जळगाव : पद्मालय विश्राम गृहासमोर ठेवण्यात आलेली कचराकुंडी वेळेवर उचलण्यात येत नसल्यामुळे, कचरा ओसंडून वाहत आहे. त्यात पाळीव प्राण्यांनी हा कचरा रस्त्यावर पसरविल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्यामुळे साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रेल्वे स्टेशन समोरील पोलीस चौकी बंद
जळगाव : रात्रीच्या वेळी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनातर्फे रेल्वे स्टेशन समोरील पोलीस चौकी दोन महिन्यांपूर्वी नियमित सुरू करण्यात आली होती. काही दिवस ही पोलीस चौकी सुरळीत सुरू झाल्यानंतर, आता संचारबंदीच्या काळात ही पोलीस चौकी पुन्हा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही पोलीस चौकी पुन्हा २४ तास सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
चेन ओढल्यामुळे काशी एक्स्प्रेस रस्त्यातच थांबली
जळगाव : मुंबईहून जळगावकडे येणाऱ्या काशी एक्स्प्रेसची चेन एका प्रवाशाने ओढल्यामुळे, ही गाडी शिरसोलीजवळ पाच.......... दोन............... मिनिटे थांबली. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी चेन ओढणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन, त्याला जळगाव रेल्वे पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिले. त्या तरुणावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
सेवाग्राम एक्स्प्रेस रद्दमुळे विदर्भ एक्स्प्रेसला गर्दी
जळगाव : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द केली आहे. यामुळे विदर्भात जाण्यासाठी मुंबई-नागपूर विदर्भ एक्स्प्रेसला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. सेवाग्राम एक्स्प्रेस रद्दमुळे या गाडीवर प्रवाशांचा भार वाढल्यामुळे, अनेक प्रवाशांची तिकिटे वेटिंगला आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुन्हा सेवाग्राम एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण
जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शिरसोली, आव्हाणे, असोदा या भागात तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे, नागरिकांना ऐन उन्हाळ्यात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तसेच जळगाव शहरातील वाघनगर, अयोध्यानगर, पिंप्राळा या भागातही अधून-मधून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरणतर्फे सध्या विजेची तांत्रिक कामे सुरू असली तरी, या कामासाठी सर्व ठिकाणचा वीज पुरवठा खंडित न करता, काम सुरू असलेल्या भागातीलच वीज पुरवठा खंडित करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.