बेवारस म्हणून दफन केलेल्या भादलीच्या तरुणाचा मृतदेह उकरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:17 IST2017-09-12T22:17:12+5:302017-09-12T22:17:12+5:30
:रेल्वे अपघातात ठार झालेल्या तरुणावर बेवारस म्हणून दफनविधी केलेल्या तरुणाची १२ दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर स्मशानभूमीत जाऊन पुरलेला मृतदेह उकरण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नातेवाईकांनी या तरुणावर सायंकाळी विधीवत अंत्यसंस्कार केले. नारायण राजाराम ठाकूर (वय ३०, रा.भादली, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

बेवारस म्हणून दफन केलेल्या भादलीच्या तरुणाचा मृतदेह उकरला
१२ दिवसानंतर पटली ओळख : नातेवाईकांनी केले विधीवत अंत्यसंस्कार
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१३ :
रेल्वे अपघातात ठार झालेल्या तरुणावर बेवारस म्हणून दफनविधी केलेल्या तरुणाची १२ दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर स्मशानभूमीत जाऊन पुरलेला मृतदेह उकरण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नातेवाईकांनी या तरुणावर सायंकाळी विधीवत अंत्यसंस्कार केले. नारायण राजाराम ठाकूर (वय ३०, रा.भादली, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेत मजुरी करणाºया नारायण ठाकूर या तरुणाचा ३० आॅगस्ट रोजी भादली स्टेशनजवळ रेल्वे अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने नशिराबाद पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. शासकीय नियमानुसार तीन दिवसात त्याची ओळख न पटल्याने पोलिसांनी नेरी नाका स्मशानभूमीत या तरुणाचा दफनविधी केला. दुसरीकडे मुलगा घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. घरी येण्याची प्रतिक्षा संपल्याने वडील राजाराम दिपचंद ठाकूर, भादली विद्यालयात शिक्षक असलेले चुलत भाऊ एस.पी.ठाकूर व अन्य नातेवाईक सोमवारी नशिराबाद पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तेथे त्यांना एका तरुणाचा मृतदेह भादली रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याची माहिती मिळाली.
अन् नातेवाईकांनी जळगाव गाठले
नारायण ठाकूर या तरुणाचा फोटो दाखविल्यानंतर पोलिसांनीही मयताला ओळखले. मंगळवारी तहसीलदारांची परवानगी घेऊन पोलिसांच्या समक्ष नेरी नाका परिसरात पुरलेला मृतदेह उकरण्यात आला. मृतदेह पाहताच आई, वडील व अन्य नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेची माहिती अन्य नातेवाईकांनी तातडीने कळविण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता विधीवत पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नशिराबाद पोलीसही उपस्थित होते.
पत्नी ठाण्याला पोलीस कॉन्स्टेबल
नारायण ठाकुर या तरुणाकडे थोडीफार शेती आहे. त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो. वडील राजाराम पाटील, आई हिराबाई हे दोन्ही शेती काम करायचे तर नारायण यांची पत्नी निशा या ठाणे ग्रामीणला पोलीस कॉन्स्टेबल आहे. सायंकाळी उशिरापर्यंत त्या जळगावमध्ये पोहचलेल्या नव्हत्या.