ओबीसी आरक्षणावरून जळगावात समता परिषदेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:23+5:302021-06-21T04:13:23+5:30
जळगाव : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे हे आरक्षण वाचविण्यासाठी ...

ओबीसी आरक्षणावरून जळगावात समता परिषदेचा रास्ता रोको
जळगाव : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे हे आरक्षण वाचविण्यासाठी युवक समता परिषदेच्यावतीने रविवारी दुपारी सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना अटक करून, काही वेळाने त्यांची सुटकाही केली.
राज्यातील पाच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण विरोधात दाखल याचिकेचा नुकताच निकाल आला आहे. या निकालामुळे महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकेच्या एकूण २ हजार ७३६ जागांमधून ७४० जागा कमी होणार आहेत. तसेच १२८ नगरपंचायती व २४१ नगरपालिकांमधल्या ७ हजार ४९३ जागांपैकी २ हजार ९९ जागा कमी होणार आहेत. तसेच राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील २ हजार जागांमधुन ५३५ जागा तर ३५१ पंचायत समित्यांमधुन ४ हजार जागांपैकी १ हजार २९ जागा कमी होणार आहेत. तसेच राज्यातील २७ हजार ७८२ ग्रामपंचायती मधील अंदाजे १ लाख ९० हजार ६९१ जागांपैकी ५१ हजार ४८६ जागा ओबीसी संवर्गातील कमी होत आहे. त्यामुळे या निर्णयानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचण्यासाठी रविवारी दुपारी आकाशवाणी चौकात समता परिषदेच्या युवक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून, शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
इन्फो :
पोलिसांकडून अटक व सुटका
रास्ता रोको आंदोलन करतेवेळी पोलिसांनी समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, यांच्यासह ज्ञानेश्वर महाजन, शालिग्राम मालकर, ज्ञानेश्वर महाजन, धनराज माळी, राजेंद्र महाजन,युवक आघाडीचे महानगराध्यक्ष हेमरत्न काळुंखे, उपाध्यक्ष नितीन महाजन, संतोष परदेशी, गजानन महाजन, कन्हैया देवरे, चंदू माळी,जितेंद्र महाजन आदी कार्यकर्त्यांना अटक करुन पोलीस ठाण्यात आणले व त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन काही वेळाने त्यांची सुटकाही केली.