केळी निर्यातीमुळे पहूरच्या शेतकऱ्याचे नाव सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 14:36 IST2019-04-21T14:36:48+5:302019-04-21T14:36:53+5:30
गुणवत्तेमुळे मागणी । मंदीतही मिळतोय चांगला भाव

केळी निर्यातीमुळे पहूरच्या शेतकऱ्याचे नाव सातासमुद्रापार
पहूर ता. जामनेर : दरवर्षी जामनेर तालुक्यात पर्जन्यमान घटत असल्याने शेतकऱ्यांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. असे असताना केळीचे उत्पादन घेणे जोखमीचे आहे. मात्र याला अपवाद ठरले आहे, येथील प्रगतीशील शेतकरी तथा बाजार समितीचे सभापती संजय देवराव देशमुख. यांनी दहा एकरात केळीचे उत्पादन घेऊन केळीमालाच्या गुणवत्तेमुळे अफगाणिस्तान, युरोप व इराण या देशात केळीची निर्यात केल्याने सातासमुद्रापार पहूर गावासह संजय देशमुख यांच्या नावाचा झेंडा रोवला गेला आहे.
देशमुख यांची गेल्या दहावषार्पासून केळी उत्पादक शेतकरी म्हणून ओळख आहे. सुरवातीला त्यांनी बर्हाणपूर, रावेर बोर्डवर केळी विक्री केली. जवळपास २०१९ मध्ये त्यांनी दहा एकरात पाण्याचे योग्य नियोजन करून बेड पध्दतीने केळीची लागवड केली असून २६ ते २७ ची रास पडली आहे. ८ते ९ फण्या घडाला ठेवण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणें केळी मालाला दुध्या कलर आला.
पाच कटेनर परदेशात
संजय देशमुख यांच्या शेतातून सावदा येथील केळीचे व्यापारी हितेंद्र नारंग यांच्या माध्यमातून पाच कटनेर अर्थात ११० टन केळी माल अफगाणिस्तान, इराण व युरोप या परदेशात निर्यात करण्यात आला आहे. जवळपास १९ लाख ८० हजार किंमतीचे उत्पादन झाले असून केळी मालाच्या गुणवत्तेमुळे उच्च प्रतिचा भाव मिळाला आहे. तसेच बाजारातील तेजी- मंदीतही भाव समाधान कारक मिळाला.
अशी आहे निर्यात प्रक्रिया
नाशिक पिंपळगाव येथे केळी मालावर प्रिकुल्ड प्रक्रिया करून मुंबई येथे माल पाठविण्यात येतो. तेथील बंदरावरून निर्यात करण्यात येते.