सेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे विजयाचे दावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST2021-01-19T04:18:37+5:302021-01-19T04:18:37+5:30
तिघांपेक्षा भाजप वरचढ - आ. सुरेश भोळे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, जिल्ह्याची आकडेवारी गोळा करणे ...

सेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे विजयाचे दावे
तिघांपेक्षा भाजप वरचढ - आ. सुरेश भोळे
भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, जिल्ह्याची आकडेवारी गोळा करणे सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. मात्र जिल्ह्यात सेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे तिघे पक्ष अनेक ठिकाणी भाजपच्या विचारांच्या लोकांच्या विरोधात लढले. पक्षाचे चिन्ह नव्हते तरीही या तिघांपेक्षाही भाजपाच वरचढ ठरली आहे. जामनेर, चाळीसगाव, चोपडा येथे चांगले यश मिळाले आहे.
सेनेला ८० टक्के जागांवर विजय-गुलाबराव वाघ
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, शिवसेनेने ७० ते ८० टक्के जागांवर विजय मिळविला आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी, कॉंग्रेसने यश मिळविले आहे. भाजपाला जेमतेम १० टक्के जागांवर यश मिळाले आहे. त्यातही भाजपला चाळीसगाव तालुक्यात चांगले यश मिळाले आहे. पक्षीय बलाबलाची आकडेवारी घेणे सुरू आहे.
राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचा वरचष्मा- ॲड. रवींद्र पाटील
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायतची निवडणूक ही पक्षीय नसते. गावपातळीवरील कार्यकत्यांची मेहनत, लोकप्रतिनिधींनी सोडविलेले प्रश्न या आधावरच लढली जाते. मात्र महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात शेतकरी, मजुरांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्याने महाविकास आघाडी, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सर्वाधिक यश मिळाले. एकट्या मुक्ताईनगर तालुक्यातच ८० टक्के जागा राष्ट्रवादीने मिळविल्या आहेत. अन्य ठिकाणची आकडेवारीही घेणे सुरू आहे.
कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा चांगले यश- ॲड. संदीप पाटील
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसने व महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. काही तालुक्यांमध्ये कॉंग्रेसला तर उर्वरित तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. मात्र कॉंग्रेसला अपेक्षेएवढे यश मिळाले आहे. याबाबत आकडेवारी मागविली आहे.