पोषण आहाराची रक्कम पालकांच्या खात्यात जमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:54+5:302021-07-22T04:11:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शालेय पोषण आहाराची मे महिन्यातील रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, ...

पोषण आहाराची रक्कम पालकांच्या खात्यात जमा होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शालेय पोषण आहाराची मे महिन्यातील रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांत विद्यार्थ्यांचे खाते उघडताना पालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अखेर शिक्षण विभागाने बालकांऐवजी पालकांच्या खात्यावरही रक्कम जमा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. यामुळे खाते उघडण्यास अडचण आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, त्याअनुषंगाने जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पत्र काढून मुख्याध्यापकांकडून लाभार्थ्यांची माहिती मागविली आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार घरपोच दिला जात होता. दरम्यान, उन्हाळी सुट्टी २०२१मधील म्हणजेच मे महिन्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला गेला नव्हता. या बदल्यात पोषण आहाराची रोख रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार होता. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १५६ रुपये, तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे अडीचशे रुपये अनुदान मिळणार होते. दरम्यान, हे अनुदान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्यास सांगितले गेले होते. मात्र, दहा वर्षांखाली मुलांचे बँक खाते राष्ट्रीयीकृत बँका घेत नाहीत. उर्वरित खात्यांसाठीही शून्य बॅलन्सवर खाते उघडण्यास नकार देतात. किमान पाचशे रुपये ठेव आवश्यक असते. त्यामुळे लाभ दीडशेचा अन् खाते उघडण्यासाठी लागतात ५०० रुपये अशी स्थिती झाली होती.
१ लाख ७० विद्यार्थ्यांनी काढली खाती
पाल्याचे बँक खाते काढण्यासाठी पालकांना येणारी समस्या काही दिवसांपूर्वी 'लोकमत'ने आपल्या वृत्तातून मांडली होती. त्यानंतर जिल्हा बँकेने झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास तयारी दर्शविली होती. शिक्षण विभागानेही त्यास मान्यता दिली होती. त्यानुसार आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ५० हजार ८१८ लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७० हजार ३६७ विद्यार्थ्यांनी झिरो बॅलन्सवर खाती उघडली आहेत.
पालकांचा खाते क्रमांक देण्यास मुभा
दरम्यान, आता शासनाला जाग आली असून, नवीन परिपत्रकान्वये पालकांचा खाते क्रमांक देण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार पालकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. नवीन निर्णयानुसार ज्या मुलांची आधार नोंद आहे, पण बँक खाते नाही (१० वर्षाखाली) अशा विद्यार्थ्यांचा लाभ त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त नावाने असलेल्या बँक खात्यात जमा होईल. तसेच ज्या मुलांची आधार नोंदणी नाही, त्यांची आधार नोंदणी झाल्यानंतरच त्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त खात्यात रक्कम जमा होणार आहे. शिवाय ज्याठिकाणी बँक उपलब्ध नाही. त्याठिकाणी आधार नोंदणी असलेल्या मुलांच्या / त्यांच्या पालकांच्या / संयुक्त पोस्ट खात्यात रक्कम जमा होणार आहे.
शाळांकडून मागविली माहिती
शालेय पोषण आहार योजनेस पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती संकलित करण्याची सूचना जळगाव शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण माहिती संकलित करून जिल्हास्तरावर पाठविण्याचे कळविले आहे.
आतापर्यंत बँक खाती उघडणारे विद्यार्थी
अमळनेर (१७,३८०), भडगाव (५,८२९), भुसावळ (११,५२९), बोदवड (१,६४८), चाळीसगाव (२४,६८५), चोपडा (१०,९१३), धरणगाव (४,५९२), एरंडोल (२,८६९), जळगाव ग्रामीण (९,७९०), जळगाव शहर (१७,५७४), जामनेर (११,१७९), मुक्ताईनगर (७,२०२), पाचोरा (१२,६८३), पारोळा (७,८४०), रावेर (१७,०२४), यावल (७,६३०).