अमळनेरात झुकझुक गाडीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:32 IST2018-08-17T16:32:28+5:302018-08-17T16:32:39+5:30
इतरत्रही औषधी वनस्पती व शैक्षणिक माहितीयुक्त बगीचे होण्याची शहरवासीयांची अपेक्षा

अमळनेरात झुकझुक गाडीची प्रतीक्षा
अमळनेर, जि.जळगाव : शहरात शिवाजी उद्यानाची साफसफाई करून अद्ययावत करण्यात आलाश्र स्केटिंग ट्रॅकही केला, मात्र सर्वसामान्य नागरिक तसेच लहान मुलांना बंद पडलेल्या झुकझुक आगीनगाडी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.
शहरात अनेक खुले भूखंड असताना मात्र पालिकेच्या मालकीचा फक्त एकमेव शिवाजी बगीचा लहान मुलांसाठी अद्ययावत आहे. त्या ठिकाणी झोपाळे, घसरगुंडी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाचे साहित्य उपलब्ध आहे. परंतु स्वच्छतेअभावी त्याचा लाभ मोजका होत होता. नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी साफसफाई करण्याचे आदेश दिले, माजी आमदार साहेबराव पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल यांनी समक्ष थांबून बगीचा अद्ययावत केला. शेजारीच स्केटिंग ट्रॅक केला, मात्र सर्वसामान्य नागरिक तसेच मुलांना स्केटिंग परवडत नाही. शिवाजी बगीच्यात अनेक दिवसांपासून लहान मुलांची झुकझुक आगीनगाडी व ट्रॅक उभारून पडला आहे, परंतु ती सुरूच झाली नाही. लहान मुले झुकझुक गाडीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पालिकेने ही गाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेचा हा बगीचा आहे. त्याचप्रमाणे हा बगीचा इतर नागरिकांना अत्यंत लांब पडत असल्याने पालिकेने शहराच्या पश्चिम भागातही असा लहान मुलांच्या खेळण्यांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांना व्यायामाच्या साहित्यासह फुलझाडे लावून बगीचा उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आह.े
त्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने औषधी वनस्पती व विविध फुलझाडे वनस्पतीयुक्त आणि गणितीय व भौमितिक, ऐतिहासिक माहिती असलेले अभ्यासपूर्ण माहितीयुक्त बगीचे उभारण्यात यावेत. जेणेकरून लोप पावत चाललेल्या आयुर्वेदिक वनस्पतींचे संवर्धन होऊन इतिहासाची उजळणी होऊन संस्कार मूल्ये जपली जातील. शैक्षणिक विकास होईल व देशभक्ती दृढ होईल, अशीही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
लहान मुलांची झुकझुक गाडी विजेवर चालते आणि त्यामुळे ट्रॅकमध्ये वीज प्रवाह उतरतो, म्हणून मुलांच्या सुरक्षेसाठी ती बंद ठेवण्यात आली आहे. परंतु ट्रॅकभोवती सुरक्षा कवच करून एक स्वतंत्र कर्मचारी किंवा स्वयंसेवी संस्थेला देऊन गाडी लवकरच सुरू करण्यात येईल किंवा सौर ऊर्जेवर चालवण्याचा प्रयत्न केला जाईल.
-पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा, अमळनेर