पोषण आहारातून कडधान्याबरोबरच मुलांना मिळतेय डाळ, तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:51+5:302021-02-05T05:57:51+5:30
जळगाव : जळगाव तालुक्यातील पहिली ते आठवीच्या ६२ हजार ४०७ लाभार्थी विद्यार्थ्यांना कडधान्याबरोबरच डाळ व तांदळाचेही वाटप केले जात ...

पोषण आहारातून कडधान्याबरोबरच मुलांना मिळतेय डाळ, तांदूळ
जळगाव : जळगाव तालुक्यातील पहिली ते आठवीच्या ६२ हजार ४०७ लाभार्थी विद्यार्थ्यांना कडधान्याबरोबरच डाळ व तांदळाचेही वाटप केले जात असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहाराचा लाभ मिळाला नाही, त्यांना घरपोच धान्य वाटप शिक्षकांकडून करण्यात आले असल्याचेही गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी दिली.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशातून शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. दरम्यान, २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कडधान्य, डाळ व तांदळाचे वाटप करण्यात आले़ त्यासाठी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेत बोलवून घेतले जात होते. आताही जळगाव तालुक्यातील ६२ हजार ४०७ विद्यार्थ्यांना मटकी, तूरडाळ, तसेच तांदळाचा लाभ दिला जात आहे.
घरपोच आहार
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळेतच आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र, मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. दरम्यान, कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून पोषण आहारांतर्गत तांदूळ, डाळ वाटप केले गेले़ ज्या विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळ तसेच कडधान्याचा लाभ मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना घरपोच वाटप करण्यात आले आहे.
सध्या मटकी, तूरडाळ व तांदूळ वाटप केले जात आहे़ शासनाच्या सूचनेनंतर प्रत्यक्ष पोषण आहार शिजवायला सुरुवात होईल़ तेव्हा मेन्यूमधील संपूर्ण आहाराचा पुरवठा होईल़ तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळत असून अद्याप कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही़
- सतीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग
- जळगाव तालुक्यातील एकूण लाभार्थी
६२ हजार ४०७
- पहिली ते पाचवीचे लाभार्थी
३८ हजार ३०८
- सहावी ते आठवीचे लाभार्थी
२४ हजार ९९