तमाशासह सर्व कलावंतांच्या कार्यक्रमांना परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:55+5:302021-07-22T04:11:55+5:30
जळगाव । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तमाशासह इतर अनेक कलावंतांचे कार्यक्रम, रोजगार बंद आहेत. त्यामुळे कलावंतांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, ...

तमाशासह सर्व कलावंतांच्या कार्यक्रमांना परवानगी द्या
जळगाव । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तमाशासह इतर अनेक कलावंतांचे कार्यक्रम, रोजगार बंद आहेत. त्यामुळे कलावंतांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, काही जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्व प्रकारच्या लोकवंतांच्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अन्यथा लोककलावंत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे राज्य प्रमुख सोमनाथ गायकवाड यांनी दिला.
जय महाकाली कलावंत ग्रुपतर्फे आयोजित महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीतर्फे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा शिरसोलीत झाली, याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर समितीचे राज्य कार्याध्यक्ष सुजित औताने, विनोद ढगे, प्रदेश उपाध्यक्ष शाहीर प्रेमसागर कांबळे, प्रदेश महासचिव गणेश अमृतकर आदी उपस्थित होते. शासन, प्रशासनस्तरावर राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी आदी कार्यक्रम, उपक्रमांच्या जनजागृतीसाठी लोककलावंतांना रोजगाराची संधी मिळते. मात्र, कोरोनामुळे कार्यक्रम बंद आहे. तमाशा, लग्नसमारंभात बँड पथक, धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांनासुद्धा परवानगी नाही. अशाप्रकारे असंख्य कलावंत बेरोजगार झाले असून, त्यांच्यासह कुटुंबीयांची उपासमार होत आहे. या लोककलावंतांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी समितीची जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जिल्हाप्रमुख प्रशांत कोठावदे, तर कार्याध्यक्षपदी ऋषिकेश येवले यांची नियुक्ती झाली आहे. यावेळी शीतल खलसे, वैशाली चव्हाण, अनिता अस्वार आदी उपस्थित होते.
यांनी केले मार्गदर्शन
बैठकीत गणेश अमृतकर, सुजित औताने, लोकशाहीर प्रेमसागर कांबळे, उत्तमराव अंबीलढगे, देवराम हरणे, विनोद ढगे, बबनभाई शेख, नवनाथ शिंदे आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत राज्यातील ३० जिल्ह्यांतील प्रमुखांचा सहभाग होता. सूत्रसंचालन सिद्धार्थ खिल्लारे यांनी केले. आभार अमृतकर यांनी मानले.