युतीची सज्जता, आघाडीचा घोळ कायम..!
By Admin | Updated: September 24, 2014 12:21 IST2014-09-24T12:21:28+5:302014-09-24T12:21:28+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीने शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित केल्याने त्यांनी आपला प्रचार जोमाने सुरू केला आहे.

युतीची सज्जता, आघाडीचा घोळ कायम..!
जळगाव ग्रामीण मतदारसंघ
शरदकुमार बन्सी
विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीने शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित केल्याने त्यांनी आपला प्रचार जोमाने सुरू केला आहे. याउलट आघाडीच्या उमेदवारीचा घोळ अद्याप कायम आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांविषयी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाआहे. त्यांचा उमेदवार कोण याविषयी मतदारांमध्ये कमालीचीउत्सुकता आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाची चर्चा असली तरी अद्याप त्यांची पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील 'त्या' पाच उत्सुक व इच्छुक उमेदवारांना आपल्यालाच तिकीट जाहीर होईल, असा आत्मविश्वास आहे.
पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला तालुका १९९0 नंतर सेना- भाजपाने काबीज केला. नगरपालिका, कृउबा समिती, पं. स. आजही सेना- भाजपाच्या ताब्यात आहे. मात्र २00९ च्या निवडणुकीत गुलाबराव पाटील यांचा गुलाबराव देवकर यांनी पराभव केला होता. निवडणुकीत पाटील यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसला होता. देवकर यांना ७१ हजार ५५६ तर पाटील यांना ६६ हजार ९९४ मते मिळाली होती. ४ हजार ५६२ मतांनी देवकरांचा विजय झाला होता.
नवनिर्मित जळगाव ग्रामीण मतदारसंघात पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले गुलाबराव देवकर यांना योगायोगाने नऊ खात्याचे मंत्रिपद, पालकमंत्रिपद लाभले होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जमवलेला लोकसंग्रह, केलेली विकासकामे याचा दावा करीत या निवडणुकीत उमेदवारी मिळावी असा दावा केला आहे. तर गुलाबराव पाटील हे पराभव स्वीकारून घरी न बसता मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन पुन्हा नव्या जोमाने निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. नाशिकच्या मेळाव्यात त्यांची अघोषित उमेदवारी जाहीर झाली आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात धरणगावसह तालुक्यातील ८९ गावे, जळगाव तालुक्यातील ८४ गावे, अशी १७३ गावे आहेत. त्यात पुरुष मतदार- १ लाख ५0 हजार ५३0 तर स्त्री मतदार- १ लाख ३४ हजार ४१७ अशी एकूण २ लाख ८४ हजार ९४८ मतदारसंख्या आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मराठा समाजाचे मतदार असून दुसर्या क्रमांकावर माळी व मुस्लीम समाज आहे. त्याखालोखाल कोळी, गुजर, मागासवर्गीय, तेली, धनगर या समाजाचे मतदार आहेत. महायुतीतर्फे माजी आ.गुलाबराव पाटील हे उमेदवार आहेत. १९९९ ते २00९ या दहा वर्षे आमदारपदावर असतानाचा त्यांचा अनुभव, गाजवलेली कारकीर्द व कार्यकर्त्यांसाठी धावून जाणारे म्हणून त्यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला जळगाव ग्रामीण मतदारसंघातून मिळालेल्या भरभरून मतदानामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर मात्र काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, इंटक जिल्हाध्यक्ष डी.जी. पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व माजी नगराध्यक्षा पुष्पा महाजन हे पाच उमेदवार इच्छुक आहेत.
विद्यमान आमदार गुलाबराव देवकर यांनी आपली उमेदवारी निश्चित मानली आहे. जर तांत्रिक अडचणीमुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तर आम्हाला उमेदवारी द्यावी, असा आग्रह माजी आमदार कै.मु.गं. पवार यांचे पुत्र संजय पवार यांनी, त्याचबरोबर डी.जी. पाटील यांनी धरला आहे. आजपावेतो काँग्रेस-राष्ट्रवादीने माळी समाजावर अन्याय केला असल्याचा आरोप करून आम्हाला उमेदवारी द्यावी, असा हट्ट ज्ञानेश्वर महाजन व पुष्पा महाजन यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला आहे.
गेल्या निवडणुकीत मनसेतर्फे ललित कोल्हे यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांना अवघी १३ हजार ५७0 मते मिळाली होती. मात्र या निवडणुकीत मनसेतर्फे अद्याप जळगाव ग्रामीणसाठी कोणताही चेहरा समोर आलेला नाही. तरी पाळधीचे रहिवासी जमील देशपांडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, कोणत्या पक्षात बंडखोरी होईल हे सांगणे कठीण आहे. तरी तिरंगी लढत मतदारसंघात होईल, असे वाटते. राज्यात महायुतीची सत्ता आली व गुलाबराव पाटील निवडून आले, तर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशी चर्चा आहे. तसेच आघाडीची सत्ता आली व गुलाबराव देवकर निवडून आलेले असले तर ते पुन्हा मंत्रिपदावर विराजमान होतील, अशी राजकीय वतरुळात चर्चा आहे.
-------------
■ काँग्रेसचे जिल्हा नेते तथा इंटक जिल्हाध्यक्ष डी.जी. पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवून राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये उमेदवारी अर्ज त्यांनी भरल्याची चर्चा आहे. तसे शरद पवार यांच्याशी त्यांची चर्चा झाल्याचे समजते. तर संजय पवार यांनीही पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला आहे.