महिनाभरानंतर नाशिक, औरंगाबादला बसेस रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST2021-06-02T04:13:42+5:302021-06-02T04:13:42+5:30

कोरोनामुळे निर्बंध लागू करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना ...

After a month, buses left for Nashik and Aurangabad | महिनाभरानंतर नाशिक, औरंगाबादला बसेस रवाना

महिनाभरानंतर नाशिक, औरंगाबादला बसेस रवाना

कोरोनामुळे निर्बंध लागू करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बसेस सोडण्यात येत होत्या. कोरोनामुळे महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले. मात्र, १ जूनपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता उठविण्यात आल्यामुळे महामंडळातर्फे मंगळवारपासून पुन्हा बस सेवा सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी जळगाव आगारातून नाशिक, औरंगाबाद, धुळे यासह जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, रावेर या ठिकाणी बसेस सोडण्यात आल्या.

इन्फो

तालुकास्तरावरही फेऱ्या वाढविल्या

विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले की, मंगळवारपासून परजिल्ह्यात बस सेवा सुरू झाल्यानंतर, तालुका स्तरावर प्रत्येक गावांना बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. जसे प्रवासी मिळतील, तशा बसेस सोडण्याचे सर्व आगरांना आदेश दिले असल्याचे सांगितले. तसेच निर्बंधानंतर तब्बल महिनाभराने बाहेरगावी बसेस जात असून, पहिला दिवस असल्याने फारसे प्रवासी मिळण्याची शक्यता कमी आहे. जसजशी नागरिकांना बससेवा सुरू झाल्याची माहिती होईल, त्यानुसार प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने प्रत्येक गावांना बसेस सोडून, बस फेऱ्याही वाढविण्यात येणार असल्याचे बंजारा यांनी सांगितले.

इन्फो :

तर ५ लाखांच्या वर उत्पन्न मिळण्याची शक्यता

आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील नागरिकासांठीच सोडण्यात येणाऱ्या बसेस आता, सर्व सामान्य नागरिकानांही प्रवासासाठी खुल्या झाल्या आहेत. जळगावसह जिल्हाभरातील आगारातून मंगळवारी प्रवाशांचा प्रतिसाद असलेल्या गावांना बसेस सोडण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांनी केल्या आहेत. त्यामुळे दिवसभरात जिल्हाभरातील सर्व ११ आगार मिळून पाच ते सहा लाखांच्या घरात उत्पन्न मिळणार असल्याची शक्यता महामंडळातर्फे वर्तविण्यात आली.

इन्फो :

महामंडळाच्या सूचनेनंतर ‘शिवशाही’ सुरू होणार

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शिवशाही बसदेखील बंद आहे. जळगाव आगारातर्फे आतापर्यंत पुणे, नाशिक व औरंगाबाद मार्गावर या बसेस चालविल्या जात होत्या. मात्र, कोरोनामुळे महामंडळाने शिवशाही बसेस सध्या बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, शासनाच्या सूचनेनुसारच यापुढे शिवशाही बसेस सुरू ठेवणार असल्याचेही दिलीप बंजारा यांनी सांगितले.

Web Title: After a month, buses left for Nashik and Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.