१९ तासांनंतर कोकण रेल्वे सुरू
By Admin | Updated: May 6, 2014 00:10 IST2014-05-05T22:55:14+5:302014-05-06T00:10:54+5:30
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल १९ तासांनंतर सोमवारी पहाटे कोकण रेल्वे सुरू झाली.

१९ तासांनंतर कोकण रेल्वे सुरू
मृतांची संख्या २२
मुंबई : दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल १९ तासांनंतर सोमवारी पहाटे कोकण रेल्वे सुरू झाली. तर, जखमींपैकी आणखी तिघांचा सोमवारी मृत्यू झाल्याने या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता २२ झाली आहे.
ॲक्सिडंट रिलीफ ट्रेन, ॲक्सिडंट रिलीफ मेडिकल व्हॅन, पोकलेन, डीप लॉरी, क्रेन अशा साहित्यांसह तब्बल १०० पेक्षा जास्त कर्मचारी आणि कामगार रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे काम करत होते. १९ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रेल्वे ट्रॅक सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र तसेच या मार्गावरून सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने येणारी मालगाडी धावली आणि ती सुरक्षितरित्या ट्रॅकवरुन गेल्याचे दिसताच सगळ्या रेल्वे कर्मचार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. सकाळी नऊच्या सुमारास रत्नागिरी-दादर पॅसेंजर आणि इतर एक्स्प्रेस गाड्या गेल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या अपघातातील तिघांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. गणेश नारायण चव्हाण (३२, ठाणे) आणि अतुल अशोक करविले (२६, पनवेल) अशी या मृतांची नावे आहेत. (प्रतिनिधी)