९ मिटर रस्ता अद्यापही एसपींच्या ‘कोठडीत’
By Admin | Updated: January 5, 2017 00:41 IST2017-01-05T00:41:38+5:302017-01-05T00:41:38+5:30
जळगाव : काव्य रत्नावली चौकाकडून आदर्शनगरकडे जाणाºया रस्त्यावर पोलीस अधीक्षक बंगल्याच्या कुंपणाने तब्बल ९ मिटरचा रस्ता व्यापला आहे.

९ मिटर रस्ता अद्यापही एसपींच्या ‘कोठडीत’
जळगाव : काव्य रत्नावली चौकाकडून आदर्शनगरकडे जाणाºया रस्त्यावर पोलीस अधीक्षक बंगल्याच्या कुंपणाने तब्बल ९ मिटरचा रस्ता व्यापला आहे. मनपाने या जागेवर रस्त्याचे आरक्षण टाकलेले असल्याने भूसंपादन केले आहे. तसेच मनपाने पोलीस अधीक्षक बंगल्याला आतील बाजूला वेगळी कुंपण भिंत व कर्मचारी निवासस्थानही बांधून दिले असूनही ही जागा मनपाला देण्यास टाळाटाळ होत आहे. याबाबत मनपाकडून वेळोवेळी पाठपुरावा झाला, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आदेश केले तरीही पोलीस प्रशासनाने अद्याप हा रस्ता मोकळा केलेला नाही.
काव्यरत्नावली चौक शहरातील नागरिकांचे एक पर्यटनाचे स्थळ झाले आहे. शहरातील विविध भागातून नागरिक या चौकात सकाळ, सायंकाळी येत असतात. कवयित्री बहिणाबाई चौधरी, साने गुरूजी आदींच्या कविता या चौकात कोरल्या आहेत.
आकर्षक कारंजा हे बालगोपाल मंडळींसाठी खास आकर्षण ठरते. तर येणाºया जाणाºयांसाठी बसण्यासाठीच्या खास व्यवस्थाही या ठिकाणी असल्याने परिसरातून येणारी जाणारी व्यक्ती काही क्षण येथे विसावते व थकवा घालवते. त्यातच आता या चौकात लवकरच जैन उद्योग समुहाच्या मदतीने आकर्षक असे उद्यान साकारात असून या भागातील पर्यटनही वाढणार आहे.
रस्ता मोकळा करून द्यावा याबाबत आपण स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना आदेश दिले आहेत. लवकरात लवकर रस्ता मोकळा करून द्यावा अशा सूचना असतानाही तसे होत नसल्यास योग्य नाही.
-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
१८ मिटरचा रस्ता झाला छोटा
चौकात चारही बाजुने मोकळी जागा आहे मात्र केवळ पोलीस अधीक्षक बंगल्याकडील जागा अरूंद दिसते. बंगल्याच्या कुंपणाला लागूनच साने गुरूजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही कविता एका संगमरवरी खडकावर कोरली आहे. या कुंपणाच्या आतील जागा ही आदर्श नगर, गणपती नगरकडे येण्याजाण्यासाठी आहे. मात्र जवळपास ९ मिटरची ही जागा बंगल्याच्या कुंपणात गेल्याने केवळ याच भागात चौक अरूंद दिसतो. मात्र आत पोलीस अधीक्षकांचा बंगला असल्याने ‘पंगा’ घेणार कोण? असा प्रश्न मनपातील पदाधिकारी तसेच प्रशासनातील अधिकाºयांनाही पडतो. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने भूसंपादन करूनही वर्षानुवर्षे हा रस्ता पोलीस अधीक्षक बंगल्याच्या ‘कोठडीत’ असल्याचीच प्रचिती येत आहे.
न्यायालयाचेही आदेश
बंगल्याच्या आत गेलेला नऊ मिटर रस्ता मोकळा करून मिळावा म्हणून महापालिकेने यापूर्वी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठानेही रस्ता मोकळा करून द्यावा म्हणून आदेश दिले आहेत. मात्र तरीही त्या आदेशांची अंमलबजावणी झालेली नाही.
दोन मंत्र्यांनी दिले आदेश
४याप्रश्नी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील रस्ता मोकळा करून द्यावा अशा सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. मात्र त्याचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.