१६२ शेतकऱ्यांचे तगाई बोझे कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:01+5:302021-08-22T04:19:01+5:30
अमळनेर : शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर असलेले तगाई बोझ्यांमुळे कर्ज आणि खरेदी विक्रीस येत असलेल्या अडचणी तगाई बोझे ...

१६२ शेतकऱ्यांचे तगाई बोझे कमी!
अमळनेर : शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर असलेले तगाई बोझ्यांमुळे कर्ज आणि खरेदी विक्रीस येत असलेल्या अडचणी तगाई बोझे कमी केल्याने दूर झाल्या असून, तालुक्यात १६२ जणांचे बोझे कमी करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे, तर स्वतःचा पिकपेरा लावता येत असल्याने शेतकरी हायटेक झाला आहे.
सतत दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी, अडचणी दूर करण्यासाठी शासनाने स्वातंत्र्य दिनापासून शेतकऱ्यांना पीक पेरा लावण्याचे स्वातंत्र्य दिले, तर अनेक वर्षांपासून शासनाने तगाई कर्ज माफ करूनही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर चारा तगाई, बंडिंग तगाईसह बंद पडलेल्या संस्थांचे बोझे सात बारावर दिसत होते. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नव्हते, तर खरेदी-विक्री, तसेच अनुदान आदींसाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे हे बोझे करून शेतकऱ्यांच्या डोक्यावरील संकटाचे बोझे हलके करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. याबाबत माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता.
महसूल विभागातर्फे तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि तालुक्यातील आठही मंडळात तगाई बोझे कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. १६२ बोझे कमी करण्यात आल्याने शेतकरी मुक्त झाले आहेत. अनेक वर्षांपासूनच्या अडचणी दूर झाल्या आहेत.
त्याचप्रमाणे, ई-पीक पेरा लावण्यासाठी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आपल्या तलाठी पथकासह ग्रामीण भागात ॲप मार्गदर्शन करणारे कॅम्प सुरू केले असून, १५४ गावांपैकी १४६ गावनमध्ये ॲप नोंदणी झाली. १,४०१ शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे, तर ४७५ शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून स्वतःचा पीक पेरा लावला आहे.
मंडळाधिकारी डी.एस.तारे, पी.एस. पाटील, व्ही.पी. पाटील, आय.एस. महाजन, तलाठी गणेश महाजन यांच्यासह इतर तलाठी हे कृषी विभाग कर्मचाऱ्यांचा संप असतानाही त्यांच्याशिवाय ग्रामीण भागात फिरून शेतकऱ्यांना ऑनलाइन पीक पेरा लावण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. तालुक्यात ८२ हजार ३९९ हेक्टर क्षेत्रांपैकी ६९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड केली आहे. त्यात ४१ हजार ६८९ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी झाली आहे.
स्वतः शेतात फोटो काढून पीक पेरा लावल्याने शेतकऱ्यांना धान्य विकताना, लाभ घेताना आता अडचणी येणार नाहीत.
210821\21jal_2_21082021_12.jpg
बोजा निरंक झाल्यानंतर आंनदाने सातबारा उतारे दाखवताना शेतकरी (छाया :अंबिका फोटो)