१५ दिवसात धरणगावात ४०० वीज कनेक्शन तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:23+5:302021-07-21T04:13:23+5:30

धरणगाव : कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना महावितरणकडून थकबाकीदारांचे कनेक्शन तोडण्याची विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार मागील ...

In 15 days, 400 power connections were cut in Dharangaon | १५ दिवसात धरणगावात ४०० वीज कनेक्शन तोडले

१५ दिवसात धरणगावात ४०० वीज कनेक्शन तोडले

धरणगाव : कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना महावितरणकडून थकबाकीदारांचे कनेक्शन तोडण्याची विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात साधारणत: ४०० कनेक्शन तोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे ग्राहकांना वीज बिल भरताना कोणतीही सवलत किंवा हप्ते पाडून दिले जात नाहीत. दरम्यान, कोरोनाचा कठीण काळ लक्षात घेता वीजतोडणी मोहीम तत्काळ थांबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. या परिस्थितीला तोंड देत आता कुठे जनता सावरत आहे. पण, महावितरणकडून टाळेबंदीच्या काळातील वाढीव वीज बिले देण्यात आली. सुरुवातीला सरकारने वीज बिल माफीच्या भूलथापा दिल्या; मात्र वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सरकारला जनतेची अवस्था समजत नाही का?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

महावितरणने वीज बिलांमध्ये दुरुस्ती करून द्यावी, तोपर्यंत एकही कनेक्शन तोडू नये, अशी मागणी जनतेतून होत आहे. महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सवलत देण्याऐवजी उलट शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची वीज तोडणी सुरू आहे. याविरोधात धरणगावकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सक्तीच्या वीज बिल वसुलीचा त्रास शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला होत आहे. त्यामुळे वीजतोडणी तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी भविष्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सरकारला शेतकऱ्यांची अवस्था समजत नाही का?, लोकांना सध्या रोजगार नाही. दुसरीकडे शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. अशा काळात वीज कनेक्शन तोडणे प्रचंड संतापजनक बाब आहे. वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबली नाही तर भाजपला रस्त्यावर उतरावे लागेल.

-ॲड. संजय महाजन, जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी आघाडी

कोरोनामुळे राज्यात लाॅकडाऊन असून, तो अजून पूर्ण उठलेला नाही. अनेक छोट्या व्यावसायिकांची आर्थिक घडी सुरळीत नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे सक्तीची वीज बिल वसुली, कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवण्यात यावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. याबाबत लवकरच आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधणार आहोत.

-दीपक वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

धरणगावातील वीज तोडणी मोहिमेबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून दोन हप्त्यांमध्ये ग्राहकांना सूट देण्यात यावी, अशी मागणी करणार आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल.

-पप्पू भावे, पालिका गटनेते, शिवसेना

कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यावसायिकांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे वीज बिल भरणे काही नागरिकांना शक्य होत नाही. त्यामुळे वीज कनेक्शन खंडित करणे महावितरणने त्वरित थांबवले पाहिजे. यासंदर्भात आम्ही जिल्हा काँग्रेसतर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधणार आहोत.

-चंदन पाटील, तालुका उपाध्यक्ष, काँग्रेस

थकबाकी असल्यामुळे मागील १५ दिवसात साधारण ३५० ते ४०० कनेक्शन तोडण्यात आली आहेत. दिवसाला साधारण १५ ते २० वीज कनेक्शन तोडली जातात. वीज बिल हप्त्यांमध्ये विभागणी करण्याची आम्हाला कोणतीही सूचना नाही. त्यामुळे संपूर्ण बिल भरणे आवश्यक आहे.

- एम. पी. धोटे, सहायक अभियंता, महावितरण, धरणगाव

Web Title: In 15 days, 400 power connections were cut in Dharangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.