राज्य सरकारने येत्या एक ते दहा मार्च दरम्यान शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठीचे निर्देश दिले आहेत. हे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले असून, यानुसार शिक्षण, महिला व बालविकास विभाग तसेच अन्य विभागांच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यातील अनेक कुटुंब हे रोजगार निमित्त बाहेरगावी अथवा शहरात जातात. त्यामुळे अशा कुटुंबाची थेट कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांची मुले-मुली शाळेत येतात काय हे पाहण्यात येणार आहे. तसेच त्यांना साधारपणे जूनमध्ये शाळा सुरू झाल्यास त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करणे हे या सर्वेक्षणाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्ह्यात मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाण हे राज्याच्या अन्य जिल्ह्याच्या तुलनेने अधिक असल्याने जिल्ह्यात मुलींना सायकलींचे वाटप करणे, मानव विकास योजनेतून मुलींसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करणे यासह अनेक उपाय हाती घेतले आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचे सांगण्यात आले.