- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : अनुदान आणि पीकविमा तत्काळ खात्यात जमा करावे या प्रमुख मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोंदी येथील गोदावरी नदीपात्रामध्ये आज सकाळी ११ वाजेपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. तत्काळ सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी करत आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांना व्हीके नंबर त्वरित द्यावे तसेच केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित अनुदान जमा करावे, मागील वर्षीचा पिकविमा जमा करावा, ज्या शेतकऱ्यांनी सोलरसाठी ऑनलाईन पेमेंट करून रिजेक्ट केले त्यांचे पैसे परत करावे, तसेच जुने मागील सोलर दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कार्यालयात नियमित हजर राहावे, पिकाच्या निकषाप्रमाणे पीक कर्ज वाटप करावे, थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या खत्यावरील होल्ड काढावा, वीज पुरवठा सुरळी करावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रात सकाळी ११ वाजेपासून आंदोलन सुरू केले आहे. या पात्रालगत पोलिसांचा बंदोबस्त असून जलसमाधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोदाकाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आले आहेत.
मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बाहेर येणार नाहीआंदोलनात शरद सोळुंके, गजानन उगले,संभाजी मरकड, प्रमोद सोळुंके, अनिल मरकड, पांडुरंग गात, रवी नरवडे, कृष्णा साबळे, शिवम चव्हाण, सचिन चोरमले, लहू बोराडे, शैलेश मरकड, महेंद्र खरात आदी शेतकरी आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नदीपात्राच्या बाहेर येणार नाही असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे.