घनसावंगी : तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे सोमवारी दुपारी गावालगत असलेल्या गोठ्याला आग लागली. यामध्ये कृषी अवजारे, कडबा, पाईप असे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण कळू शकले नाही. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.गावाला लागूनच शिवाजी दगडू वायसे व देवनाथ दगडू वायसे या भावांचे गोठे आहेत. दुपारी एकच्या सुमारास या गोठ्यांना अचानक आग लागली. गोठ्यात वाळलेली लाकडे, पालापाचोळा असल्याने आग भडकली. गोठ्याला लागून असलेल्या कडब्याने पेट घेतल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे गोठ्यात ठेवलेले २०० पीव्हीसी पाईप, तीन हजार कडब्याच्या पेंढ्या, बैलगाडी, शेती अवजारे, दोन विद्युत मोटारी खाक झाल्या. या आगीची झळ आजूबाजूच्या शेतक-यांच्या साहित्यालाही बसली. बाबूराव गोफणे, पांडुरंग वायसे, दत्ता वायसे यांचे शेणखताचे उकिरडेही जळाले. ग्रामस्थांनी धावाधाव करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आजूबाजूचे गोठे आग लागण्यापासून वाचले.महसूल विभागाच्या कर्मचा-यांनी पंचनामा केला. इंदर माने, लहानू बिचकुले, रावसाहेब बुधनकर, किसन माने, दुर्गादास वायसे यांची या वेळी उपस्थिती होती.