जालना : अंबड, घनसावंगी तालुक्यातील शासकीय अनुदान वाटपात झालेल्या घोटाळा प्रकरणात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील १० तलाठ्यांचे निलंबन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
सन २०२२ पासून आपत्तीच्या अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानुसार चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. चौकशी समितीच्या अहवालात ३४ कोटी ९७ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले होते. यात २६ तलाठ्यांसह १७ कृषी सहायक, ३१ ग्रामसेवकांची नावे समोर आली होती. या प्रकरणात चौकशीअंती संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पांचाळ यांनी यापूर्वीच सांगितले होते. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता चौकशीनंतर पहिल्या टप्प्यात दहा तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यात गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल गाडेकर, बाळू सानप, पवन सुलाने, शिवाजी ढालके, कल्याण बमनावत, सुनील सोरमारे, प्रवीण शिनगारे, बी.आर. भुसारे यांचा समावेश आहे.
इतर अधिकारीही रडारवरजिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी १० तलाठ्यांचे निलंबन केले आहे. चौकशीत नावे असलेल्या इतर तलाठ्यांचे खुलासे घेतले जात असून, त्यानंतर अभिलेख तपासून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सांगितले.