दावोस - स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हिंदीमध्ये भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी आज जगासमोर असलेल्या वेगवेगळया आव्हानांचा आढावा घेतला. पर्यावरणात होणारे बदल, दहशतवादात गुड आणि बॅड असा फरक करणं तसेच आत्मकेंद्रीत होणा-या जगापासून धोका असल्याचे मोदींनी सांगितले. 1997 साली एचडी देवेगौडा दावोसमध्ये येणारे भारताचे शेवटचे पंतप्रधान होते. त्यावेळी भारताचा जीडीपी 400 अब्ज डॉलर्सच्या आसपास होता. पण आता हाच जीडीपी सहापट जास्त आहे असे मोदींनी सांगितले.
आपल्या सरकारने साडेतीनवर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे दूरगामी परिवर्तन करणारे निर्णय घेतले आहेत आणि अशा निर्णयाची प्रकिया सुरु राहील. 30 वर्षानंतर भारतात पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर आले. आम्ही कोणा एकाच्या नव्हे सर्वाच्या विकासासाठी काम करत आहोत. सबका साथ, सबका विकास आमचा मंत्र आहे असे मोदी म्हणाले. दहशतवादापासून जगाला जितका धोका आहे त्यापेक्षा जास्त धोका दहशतवादामध्ये गुड आणि बॅड फरक करण्यामुळे आहे असे मोदी म्हणाले.
आज आपण स्वत:च्या स्वार्थासाठी निर्सगाला हानी पोहोचवत आहोत. हा विकास आहे का ? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. वातावरण बदलाच आज मानवतेसमोर मोठ आव्हान आहे असे मोदी म्हणाले. आत्मकेंद्रीत होणा-या जगापासूनही धोका आहे. असा आत्मकेंद्रीतपणा जागतिकीकरणाची जी व्याख्या आहे त्याविरोधात जाणारा आहे असे मोदी म्हणाले. जगात अर्थकारण वेगान पुढे जातयं आणि राजकीय बदलही घडतायत. शांतता, स्थिरता आणि सुरक्षेसमोर नवी आणि गंभीर आव्हाने आहेत. भारतीयांचा तोडण्यावर नव्हे जोडण्यावर विश्वास असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. आजा डेटामुळे अनेक संधी निर्माण होत आहेत. पण डेटाचा तयार होणारा डोंगर एक आव्हान आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.