पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर पाकिस्ताननेभारताच्या आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील ११ हवाई तळांना लक्ष्य केले होते. त्यामुळे अखेरीस पाकिस्तानला युद्धविरामाची विनवणी करणे भाग पडले होते. मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये नामुष्की ओढवल्यानंतरही पाकिस्तानकडून विविध मार्गांनी आगळीक सुरूच आहे. त्यात आता अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे फिल्ड मार्शन आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला जाईल, असा दावा केला आहे. तसेच काश्मीरबाबतही लवकरच चांगली बातमी येईल, अशी मुक्ताफळे उधळी आहेत.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी भारताचे तुकडे करून १९७१ च्या पराभवाचा बदला घेण्याचा दावा केला आहे, अशी माहिती पाकिस्तानी पत्रकार अजाज सय्यद यांनी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात दिली आहे. तर आसिम मुनीर यांच्या भाषणावेळी तिथे उपस्थित असलेल्या नोमान मुगल यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही चीनसोबत मिळून भारताविरोधातील युद्ध लढलो, असे आसिम मुनीर म्हणाले. तसेच मुनीर यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहतवादी हल्ल्याला दहशतवादी हल्ला मानण्यास नकार दिला.
यादरम्यान आसिम मुनीर यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारताविरोधात पाच आघाड्यांवर लढाई लढली. त्यात सायबर वॉरफेअरचाही समावेश होता. पाकिस्तानी सायबर हल्ल्यांनी ७० टक्क्यांपर्यंत ग्रिड स्टेशन हॅक झाली होती. तसेच ती बंद करण्यात आली होती. एवढंच नाही तर पाकिस्तानचे ड्रोन गुजरात आणि दिल्लीपर्यंत पोहोचले होते. एवढंच नाही तर भारताच्या रेल्वे नेटवर्कलाही हॅक करण्यात आल्याचा दावाही आसिम मुनीर यांनी केला.
भारताबरोबर झालेल्या संघर्षामध्ये लढण्यासाठी पाकिस्तानला चीनकडून हत्यारे आणि लष्करी उपकरणे मिळाली होती. तसेच त्यांचा पाकिस्तानने ज्याप्रकारे वापर केला, ते पाहून चीनही प्रभावीत झाला, असा दावाही आसिम मुनीर यांनी केला आहे.