दहशतवाद्यांना एवढी वर्षे पोसलेला पाकिस्तान आता चोहोबाजुंनी अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहे. पाकिस्तान आधीच सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात स्थानिकांसोबत झगडत असताना आता अफगानिस्तान सीमेवरही चौक्या वाचविण्यासाठी धडपड करत आहे. आधीच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एलओसीवर चौक्या सोडून जीव वाचविण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. तिथे भारताने जिरवली असली तरी पाकिस्तान जगात आपणच भारतावर हल्ले केल्याचे दावे करत सुटला आहे. अशातच अफगान सीमेवरून मोठी घडामोड येत आहे.
अफगाणिस्तानातील हेलमंड प्रांतातील सीमावर्ती शहर बहराम चाह पुन्हा एकदा सशस्त्र संघर्षाचे केंद्र बनले आहे. पाकिस्तानचा चगाई जिल्हा या सीमेला लागून आहे. पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानमधील संघर्ष आता वेगळ्या वळणावर गेला असून पाकिस्तानने या भागातील २.५ लाख लोकांना त्यांची घरे तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तालिबाननेही त्यांच्या सीमेवरील लोकांना घरे रिकामी करण्यास सांगितली आहेत. ३ फेब्रुवारीपासून सुरु झालेला या भागातील संघर्ष आता हळूहळू मोठ्या युद्धाकडे वळू लागला आहे.
तालिबानने त्यांच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी नवीन चौकी बांधण्यास सुरुवात केली होती. किस्तानी सैन्याने कराराचे उल्लंघन असल्याचे सांगत त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. यामुळे संतापलेल्या तालिबानींनी पाकिस्तानच्या चेकपोस्टवर मोर्टार डागले आणि ती चौकीच उडवून दिली. या परिस्थितीमुळे आधीच ताणलेले पाक-अफगाण संबंध आणखी तणावपूर्ण बनले आहेत.
या दोन देशांदरम्यानच्या ड्युरंड रेषेवर हा संघर्ष सुरु झाला आहे. ड्रग्ज तस्करी, शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि बंडखोरांच्या कारवायांसाठी हा भाग कुप्रसिद्ध आहे. बहराम चाह चेकपोस्ट उध्वस्त होणे चगाई आणि हेलमंडमधील लष्करी कारवायांसाठी पाकिस्तानला परवडणारे नाही. तालिबान्यांनी हेच चेकपोस्ट उडवून दिले आहे.