पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात अलीकडेच मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर अनेक हल्ले करत बलूचिस्तान स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केली. आता पाकिस्तानातील सिंध प्रांतात स्वतंत्र सिंधुदेशाची मागणी करत आहेत. यासाठी सुरू असलेले आंदोलन बलूचिस्तानातील आंदोलनातून प्रेरित आहे. सिंधु प्रांतातील लोक वेगळी भाषा, संस्कृती आणि अधिकारांसाठी लढत आहेत. पाकिस्तानी सरकार विशेषत: पंजाबमधील नेतृत्व दुजाभाव करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
सिंधुदेश आंदोलन काय आहे?
सिंधुदेशचा अर्थ वेगळा देश जो सिंधी लोकांसाठी असेल. या आंदोलनाची सुरुवात १९५० च्या दशकात झाली जेव्हा पाकिस्तानात वन यूनिट प्लान लागू केला. या योजनेतून सिंध, बलूचिस्तान आणि अन्य प्रांतांना एका राज्यात सामावून घेण्यात आले. ज्यामुळे सिंध प्रांताची ओळख धोक्यात आली. त्याशिवाय ऊर्दू भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देत सिंधी भाषा आणि संस्कृतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. १९७१ साली बांगलादेशाची स्थापना झाल्यानंतरही या आंदोलनाला बळ मिळाले. बांगलादेशाने वेगळी भाषा आणि संस्कृतीच्या आधारे स्वातंत्र्य मिळवले. १९७२ साली जय सिंध तहरीक सुरू करण्यात आले ज्यात सिंधुदेशाचा विचार ठेवला गेला.
सिंध प्रांतातील लोकांची समस्या काय?
या आंदोलनात जय सिंध फ्रिडम मूवमेंट, जय सिंध कौमी महाज, सिंधुदेश लिबरेशन आर्मी, जय सिंध विद्यार्थी संघटना यासारख्या विविध संघटनांचा समावेश आहे ज्या सिंध प्रांताला पाकिस्तानपासून वेगळा करण्याची मागणी करत आहेत. पाकिस्तानी सैन्य आणि सरकारकडून सिंध प्रांतातील लोकांवर अन्याय केला जातो. विनाकारण अनेक युवकांना अटक केली जाते. काहींना गायब केले जाते, काहींची हत्या होते. पाकिस्तानी सरकारमध्ये पंजाबी लोकांचे वर्चस्व आहे. पंजाबला जास्त फायदा पोहचवला जातो तर सिंध प्रांताचे शोषण केले जाते. कराचीसारख्या बड्या शहराला सिंधपासून वेगळे करण्यात आले ज्यामुळे सिंध प्रांताची आर्थिक ताकद कमी झाली असा आरोप तिथले लोक करतात.
दरम्यान, सिंधुदेश आंदोलन आतापर्यंत बहुतांश शांततेच्या मार्गाने झाले. लोक रस्त्यावर उतरतात, रॅली काढतात. अलीकडेच जय सिंध फ्रिडम मूवमेंटने राष्ट्रीय महामार्गावर धरणे आंदोलन केले. येणाऱ्या काळात सिंधु देशाच्या मागणीसाठी बलूचिस्तानसारखे हिंसक आंदोलन होऊ शकते असं विश्लेषकांना वाटते. सिंधुदेश लिबरेशन आर्मीसारख्या संघटनांनी आधीच शस्त्रे उचलण्याची भाषा केली आहे. या आंदोलनाला शहरातील सिंधी लोकांनी, युवकांनी समर्थन दिले आहे. पाकिस्तानात मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे, ते थांबवले पाहिजे अशी मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे सिंध प्रांतातील लोक करतात. जर सिंध प्रांतातील आंदोलनाने हिंसक स्वरुप धारण केले तर पाकिस्तानसमोर मोठं संकट उभे राहू शकते. त्यामुळे पाकिस्तान अस्थिर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.