Operation Sindoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरातील मीडियावर तोंडघशी पडलेला पाकिस्तान अजूनही सुधारलेला दिसत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील दहशतवाद्यांना पोसणारा देश, अशी ओळख निर्माण करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवाद्यांनाच जवळ केले आहे. पाकिस्तानमधून काही फोटो समोर आले आहे, ज्यात लष्कर, जैशचे कुख्यात दहशतवादी आणि शाहबाज शरीफ यांचे मंत्री एकाच मंचावर दिसत आहेत.
28 मे रोजी पाकिस्तानच्या पंजाबमध्ये युम-ए-तकबीरनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 1998 मध्ये याच दिवशी पाकिस्तानने बलुचिस्तानमधील चगाई येथे यशस्वीरित्या अणुचाचणी करुन अणुसंपन्न राष्ट्र बनले. परंतु या युम-ए-तकबीर कार्यक्रमात शाहबाज शरीफ यांचे अनेक मंत्री कुख्यात दहशतवाद्यांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. पाकिस्तानचे अन्न मंत्री मलिक रशीद अहमद खान आणि पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक मुहम्मद अहमद खान हे लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी सैफुल्लाह कसुरी, हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद आणि आमिर हमजा यांच्यासोबत बसलेले दिसतात. हे दोन्ही मंत्री पंतप्रधान शाहबाज यांचे खूप जवळचे आहेत.
या कार्यक्रमात दहशतवादाचे गौरव करण्यात आले आणि भारताविरुद्ध चिथावणीखोर भाषणेही देण्यात आली. दहशतवाद्यांपासून अंतर ठेवण्याऐवजी, शाहबाजचे हे मंत्री मंचावर दहशतवाद्यांचे स्वागत करताना, त्यांना मिठी मारताना, त्यांचे कौतुक करताना आणि पाकिस्तानच्या संरक्षणात या दहशतवाद्यांच्या भूमिकेचे गौरव करताना दिसले. शाहबाजचे मंत्री मलिक रशीद यांनी उघडपणे जाहीर केले की, पाकिस्तानच्या 24 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व हाफिज सईद आणि सैफुल्लाह कसुरी सारखे लोक करत आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सैफुल्लाह कसुरीची या कार्यक्रमात उपस्थिती सर्वात आश्चर्यकारक होती. पहलगाम हल्ल्यानंतर कसुरी भूमिगत झाला होता. 24 मिनिटांच्या द्वेषपूर्ण भाषणात कसुरीने अभिमानाने सांगितले की, पहलगाम हल्ल्यासाठी मला जबाबदार धरण्यात आले होते आणि आता संपूर्ण जग माझे नाव ओळखते. या कार्यक्रमात कसुरीची उपस्थिती आयएसआयने बहावलपूरमध्ये कसुरीला आश्रय दिल्याच्या गुप्तचर माहितीची पुष्टी करते.
यादरम्यान, लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक आमिर हमजा खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो आणि व्हिडिओ आयएसआय आणि लष्कर यांच्यातील संबंधांची पुष्टी करतात.