India Pakistan loc tensions: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला गेला. त्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली की, पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी सीमारेषेजवळील चौक्या रिकाम्या गेल्या आहेत. चौक्यांवरील झेंडेही उतरवण्यात आले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तणाव वाढल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवरील चौक्यांतून जवानांना हटवण्यात आले आहे. इंडिया टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने मुद्दामहून गोळीबार केला जात आहे. त्याला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
नौशेरा, सुंदरबनी, अखनूर, बारामुल्ला आणि कुपवाडा या भागातील अनेक ठिकाणी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला आहे. पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, त्याला आता भारतीय लष्कराकडूनही उत्तर दिले जात आहे.
पाकिस्तान लष्कराने चौक्यांवरील झेंडे उतरवले
रिपोर्टनुसार, सीमेलगत असलेल्या पाकिस्तानच्या काही चौक्या रिकामा झाल्या आहेत. या चौक्यावर तैनात असलेले जवान निघून गेले असून, त्या चौक्यांवरील झेंडेही उतरवण्यात आले आहे. अशी क्वचितच उचलली जातात. ज्याचा अर्थ माघार घेतल्याचे संकेत असल्याचे मानले जाते.
नियंत्रण रेषेवरील २० चौक्यांवर अंदाधूंद गोळीबार
मंगळवारी (२९ एप्रिल) रात्री जवळपास २० सीमेरेषेलगतच्या चौक्यांवर तुफान गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करत हा अंदाधुंद गोळीबार केला.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही आता प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या बैठकांच्या सत्रांमुळे सीमेवरील तणाव आणखी वाढू लागला आहे.