५ ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या आवामी लीगच्या शेख हसीना यांच्या सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. शेख हसीना कसाबसा जीव वाचवून ढाकातून बाहेर पडल्या आणि भारतात शरण आल्या. त्या अजूनही भारतात आहेत परंतु त्यांच्याबाबत अधिकृत माहिती नाही. बांग्लादेश पुन्हा एकदा अराजकतेच्या वाटेवर उभा आहे. तिथल्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर राजकीय पक्ष, सैन्य, कर्मचारी आणि शिक्षक नाराज आहेत. ज्या परिस्थितीत शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले तशीच परिस्थिती बांगलादेशात सध्या निर्माण होत आहे. त्यात आता नवीन खुलासा समोर आला आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेला दहशतवादी लश्कर ए तोयबाचा कमांडर मुजम्मिल हाजमीने दावा केलाय की, हसीना सरकार त्यांच्यामुळेच पडले आहे. त्याशिवाय त्याने भारतासोबत युद्धाची धमकी दिली आहे. OsintTV ने त्यांच्या X प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातील एक व्यक्ती भारत आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गरळ ओकत आहे. OsintTV ने तो संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी मुजम्मिल हाजमी असल्याचं म्हटलं आहे. तो जो काही बोलत आहे त्यावरून तो पाकिस्तान सरकार आणि तिथल्या सैन्याचा प्रवक्ता असल्याचे दिसून येते. त्याने ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करत बांगलादेशातील सरकार पाडल्याचा दावाही केला आहे.
मोदींचा उल्लेख करत हा दहशतवादी म्हणतो की, आम्ही मागील वर्षी बांगलादेशात तुला मात दिली. तू ७ मेला रात्रीच्या अंधारात आला, आम्ही १० मे रोजी उजेडात आलो होतो. आम्ही प्रत्युत्तर देत आहोत, यापुढेही देत राहू. जर तू मैदानात आला, तर आम्हीही मैदानात येऊ अशी धमकी त्याने दिली आहे. मागील वर्षी बांगलादेशात सत्तांतर झाले. त्यात तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना जीव वाचवून देश सोडावा लागला. तिथे आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी हल्ला केला. या हल्ल्यापूर्वी शेख हसीना सुरक्षित भारतात आल्या. त्यानंतर बांगलादेशात जनरल वाकर उज जमानच्या नेतृत्वात सरकार बनवले. त्यानंतर अंतरिम सरकारची स्थापना झाली.
मोहम्मद युनूस यांना कमान देण्यात आली. बांगलादेशात परकीय शक्तींनी अराजकता माजवून तिथले सरकार पाडले असा आरोप होत आहे. खासकरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तानी समर्थक जमात ए इस्लामी चेहरा समोर आला होता. परंतु आता लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याने जो दावा केला आहे त्यातून भारताच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान उभं राहिल्याचे दिसून येते.