Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरचा मुद्दा ब्रिटन संसदेत गाजला; शांतता राखण्याचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 09:14 AM2019-08-08T09:14:10+5:302019-08-08T09:14:44+5:30

भारत सरकारच्या निर्णयावरुन ब्रिटन संसदेत चर्चा करण्यात आली.

Jammu and Kashmir: Britain Expresses Concern Over Jammu And Kashmir Appeals To Maintain Peace | Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरचा मुद्दा ब्रिटन संसदेत गाजला; शांतता राखण्याचे केले आवाहन

Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरचा मुद्दा ब्रिटन संसदेत गाजला; शांतता राखण्याचे केले आवाहन

googlenewsNext

लंडन - जम्मू काश्मीरचं विभाजन आणि कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. भारत सरकारच्या या निर्णयावर ब्रिटन संसदेत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनिक राब यांनी स्वत: या प्रकरणावरुन भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. भारताच्या दृष्टीकोनातून ब्रिटनने या प्रश्नाची व्याप्ती समजून घेतली तसेच सध्याच्या परिस्थितीत शांतता राखण्यात यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. 

भारत सरकारच्या निर्णयावरुन ब्रिटन संसदेत चर्चा करण्यात आली. त्यावेळी संसदेच्या काही सदस्यांनी भारताच्या निर्णयावरुन चिंता व्यक्त केली तर काही सदस्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. काश्मीर मुद्द्यावरुन असणाऱ्या स्थितीवर ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बोलून चिंता व्यक्त केली. भारताच्या स्थितीवर ब्रिटन लक्ष ठेऊन असल्याचं सांगितले. 

सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक मांडत कलम 370 हटविण्याची शिफारस केली. त्याला तात्काळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयावर देशभरातून कौतुक करण्यात आले मात्र आता या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होऊ लागले आहेत. 

पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला. तसेच हा मुद्दा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या वेळी त्यांची जीभ घसरली. भारताच्या या पावलामुळे काश्मीरमधील हालत आणखी गंभीर होईल. त्यांनी यापुढे जात भारताने पुलवामासारख्या हल्ल्याला आमंत्रण दिल्याचे म्हटले आहे. तर, इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी युद्धाची भाषा केली आहे. फवाद चौधरी म्हणाले, 'संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार राहायला हवे असं सांगितले. 

तसेच  पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय, भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. म्हणजेच, राजकीय संबंधांचा दर्जा कमी केला आहे. त्यामुळे  पाकिस्तानमधील भारताच्या उच्चायुक्तांना भारतात परत पाठविणार आणि नवी दिल्लीतील आपल्या उच्चायुक्तांना पाकिस्तानमध्ये परत बोलवणार आहे
 

Web Title: Jammu and Kashmir: Britain Expresses Concern Over Jammu And Kashmir Appeals To Maintain Peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.