भारताच्या दणक्याने पाकिस्तान बिथरला
By Admin | Updated: June 11, 2015 23:55 IST2015-06-11T23:55:57+5:302015-06-11T23:55:57+5:30
म्यानमारच्या हद्दीत घुसून भारताने १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, दहशतवाद्यांना खुलेआम आश्रय देणाऱ्या पाकच्या छातीत धडकी भरली

भारताच्या दणक्याने पाकिस्तान बिथरला
इस्लामाबाद : म्यानमारच्या हद्दीत घुसून भारताने १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, दहशतवाद्यांना खुलेआम आश्रय देणाऱ्या पाकच्या छातीत धडकी भरली असून, पाक बिथरला आहे. पाक म्हणजे म्यानमार नव्हे, पाककडे अण्वस्त्रे आहेत हे विसरू नका, असा इशारा पाक भारताला देत आहे.
म्यानमारच्या भूमीचा आश्रय घेऊन भारतात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. आॅपरेशन फत्ते नावाने केलेल्या या कारवाईत भारताने फक्त ४५ मिनिटांत १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईनंतर भारतातील राजकीय पातळीवर या कारवाईची प्रशंसा होत असून, हा पाकलाही इशारा असल्याचे म्हटले जात आहे.
यामुळे पाकिस्तान बिथरला असून, पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली व लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी भारताला लगेचच प्रतिइशारा दिला आहे. पाकिस्तान म्हणजे म्यानमार नव्हे, सीमेपलीकडून आलेल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. पाकविरोधात कोणाचे मनसुबे असतील तर ते उधळून लावू असा इशारा या पाकिस्तानी नेत्यांनी दिला आहे. अशी वक्तव्ये करून या पाक नेत्यांनी भारतातील दहशतवादी कारवायात पाकिस्तानचा हात असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. (वृत्तसंस्था)