नेपाळला भारत देणार १ अब्ज डॉलर
By Admin | Updated: June 25, 2015 23:54 IST2015-06-25T23:54:33+5:302015-06-25T23:54:33+5:30
भारताने भूकंपग्रस्त नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी गुरुवारी १ अब्ज डॉलरच्या साहाय्याची घोषणा केली. नेपाळी बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी आपण तेथील सरकारच्या

नेपाळला भारत देणार १ अब्ज डॉलर
काठमांडू : भारताने भूकंपग्रस्त नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी गुरुवारी १ अब्ज डॉलरच्या साहाय्याची घोषणा केली. नेपाळी बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी आपण तेथील सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही भारताने म्हटले.
नेपाळच्या मदतीसाठी आयोजित आंतरराष्ट्रीय दात्यांच्या संमेलनात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही घोषणा केली. विध्वंसाच्या ढिगाऱ्यातून एक मजबूत, अखंड व अधिक निश्चिंत नेपाळ पुन्हा उभा राहील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, भूकंपाला दोन महिने उलटले असले तरी आजही सुमारे ३० लाख लोकांना मानवीय साहाय्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) म्हटले आहे. तात्पुरते निवारे, जेवण, मूलभूत आरोग्य सुविधा, स्वच्छता व उपजीविका आदी बाबी प्रमुख गरजा बनल्या आहेत.
दुसरीकडे नेपाळ भूकंपाच्या विध्वंसातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना तात्पुरता संरक्षण दर्जा देण्याची व काही काळ देशात राहू देण्याची घोषणा केली आहे. नेपाळला १८ महिन्यांसाठी तात्पुरता संरक्षण दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)