संयुक्त राष्ट्रसंघ - गाझामध्ये तत्काळ बिनशर्त व कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या ठरावावर भारतासह १९ देशांनी तटस्थ भूमिका घेत मतदान टाळले. स्पेनने हा ठराव मांडला होता.
या ठरावात बिनशर्त कायमस्वरूपी युद्धबंदीसह हमास आणि इतर गटांनी ओलीस ठेवलेल्या सर्व नागरिकांची तत्काळ बिनशर्त सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर झालेल्या मतदानात भारत व इतर १९ देशांनी भाग घेतला नाही. १२ देशांनी विरोधात तर १४९ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
‘नागरिकांची सुरक्षा व कायदेशीर तसेच मानवीय उत्तरदायित्वाचे रक्षण’ अशा शीर्षकाखाली हा ठराव मांडला होता. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी सांगितले, ‘गाझामध्ये बिघडत्या मानवीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा ठराव आहे. भारताला यामुळे निश्चित चिंता आहे. नागरिकांच्या मृत्यूंबद्दल भारताच्या वतीने निषेधच आहे.’ यापूर्वीही इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारत अशा ठरावांपासून दूर राहिला आहे.