शांततेसाठी झटूनही भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थान नाहीच - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: June 8, 2015 10:37 IST2015-06-07T20:14:11+5:302015-06-08T10:37:35+5:30
पहिल्या महायुद्धापासून बांगलादेश मुक्तीच्या लढ्यापर्यंत भारताने जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले असतानाही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अद्याप भारताला स्थान मिळू शकले नाही असे नरेंद्र मोदींनी म्हटले.

शांततेसाठी झटूनही भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थान नाहीच - नरेंद्र मोदी
>ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. ७ - पहिल्या महायुद्धापासून बांगलादेश मुक्तीच्या लढ्यापर्यंत भारताने जागतिक शांतता व सुरक्षेसाठी प्रयत्न केले असतानाही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अद्याप भारताला स्थान मिळू शकलेले नाही, ही खेदाची बाब असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ढाका येथे व्यक्त केले. मोदींच्या दोन दिवसीय बांगलादेश दौ-याची आज समाप्ती झाली, त्यापूर्वी ढाका येथे पाच हजार नागरिकांना संबोधित करताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. ' ज्या देशाने बांगलादेशवर जुलूम केले त्यांच्याच ९० हजार सैनिकांचे भारताने आत्मसमर्पण केले. भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व देण्यासाठी ही एकच बाब पुरेशी आहे.' असेही ते म्हणाले. गरीब देशांना एकत्र घेऊन आम्ही जगाच्या मंचावर पुढे जाऊ इच्छितो, असे त्यांनी सांगितले. 'दहशतवादाला कोणीतीही सीमा नसते, दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात आहे. त्याला हरवण्यासाठी मानवतावादी देशांनी एकत्र येणे अनिवार्य आहे. आपल्याला मानवतेच्या रक्षणासाठी पुढे यायला हवे. बांगलादेश हा एकमेव देश आहे, ज्याने दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरेंस'ची नीती अवलंबली आहे, त्याचे मी स्वागत करतो' असेही मोदींनी यावेळी सांगितले.
पक्षी, वारा आणि पाणी यांना व्हिसा लागत नाही. गंगा- व ब्रह्मपुत्रा नदीवर आपण एकत्र चाललो आहोत. पाणी हा राजकीय मुदा नसून मानवी मूल्यांच्या आधारे या मुद्याचे निरसन व्हायला हवे, असे ते म्हणाले.
महिला सबलीकरणासाठी बांगलादेशमध्ये करण्यात आलेले कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच भारत -बांगलादेशदरम्यान झालेला लँड बाऊंड्री करार हा हृदयांना जोडणारा करार असल्याचेही ते म्हणाले.