शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) व्यासपीठावर राजनैतिक संघर्ष बघायला मिळत आहे. भारताने आपल्या संपूर्ण सदस्यत्वाचा अर्ज रोखला असल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे. खरे तर, अझरबैजान हा पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र मानला जातो. एढेच नाही, तर तो अनेक वेळा भारतविरोधी मुद्द्यांवर पाकिस्तान सोबतही उभा राहिला आहे. मात्र, अझरबैजानच्या या दाव्यावर अद्याप भारताकडून कसल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
चीनमधील तियानजिन शहरातील SCO शिखर सम्मेलनात अझरबैजान डायलॉग पार्टनर म्हणून सहभागी झाला होता. अझरबैजानी मेडिया न्यूज.एझेडच्या वृत्तानुसार चीनने या अर्जाच्या बाजूने पाठिंबा दिला आहे. मात्र, भारताने याचा विरोध केला आहे. तसेच, या वृत्तात, भारताची भूमिका शंघाय भावनेच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे आणि भारताचा हा निर्णय अझरबैजानचे पाकिस्तान सोबत अससलेल्या जवळच्या संबंधांशी संबंधित असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पाकिस्तानने घेतला मोठा निर्णय - यातच, पाकिस्ताननेही मोठा राजनैतिक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुहम्मद इशाक डार यांनी नुकतेच, आर्मेनियाचे परराष्ट्रमंत्री अरारत मिर्जोयान यांच्यासोबत चर्चा केली. तसेच दोन्ही देशांनी परस्पर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास सहमती दर्शविली. महत्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या मध्यस्थीने अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात शांतता करार झाला आहे.
आर्मेनियासोबत नाते सुधारण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न - महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान दीर्घ काळापासूनच आर्मेनियाचा विरोध करत आला आहे आणि अझरबैजानच्या समर्थनार्थ उभा राहत आला आहे. मात्र, आता पाकिस्तान आर्मेनियाशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, आपल्या देशासोबत चर्चा केल्यानंतरच, पाकिस्तानने हा पुढाकार घेतला आहे, असा दावा अझरबैजानी माध्यमांनी केला आहे.