डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 21:23 IST2026-04-13T21:22:40+5:302026-04-13T21:23:49+5:30
Strait of Hormuz Importance for India: इराणसोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आक्रमक झाले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीच बंद करण्याची धमकी त्यांनी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच आता होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडनेही सोमवारी सकाळी १० वाजेपासून (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता) होर्मुझ बंद करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे घोषित केले. त्यादृष्टीने आता हालचाली सुरू झाल्या आहेत. पण, या निर्णयाचा भारताला बसणारा फटका मोठा असेल.
पश्चिम आशियातील या संघर्षाचे फटके भारतालाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. भारत जगातील तिसरा मोठा ग्राहक आहे आणि यातील मोठी तेल आयात ही आखाती देशांमधूनच केली जाते. हेच कारण आहे की, भारतावर होर्मुझमध्ये अडथळे आल्यास अडचणी निर्माण होतील.
होर्मुझ सामुद्रधुनी आणि भारत
होर्मुझ हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्रीमार्गांपैकी एक आहे. जगातील २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक याच मार्गाने होते. आता भारत आपल्या एकूण गरजेपैकी ९० टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात करतो. यातील मोठ्या प्रमाणात तेल येते ते होर्मुझ सामुद्रधुनीतून.
गेल्या काही वर्षात भारताने तेल, गॅस आयातीमध्ये विविधता आणली आहे. म्हणजे आखातील देशातील आयातीवर अवलंबूत्व कमी करण्यासाठी भारताने इतर देशांतूनही आयात सुरू केली. भारत ४१ देशांतून तेल आयात करतो. पण, अजूनही आखाती देशांतून येणाऱ्या गॅसचा वाटा मोठा आहे.
भारत ९० टक्के तेल-गॅसची गरज आयातीतून भागवतो. यातील ५० टक्के हे होर्मूझ सामुद्रधुनीतून येते. आणि सध्या जी तेल आणि गॅस खरेदी करावी लागत आहे, ती जास्त किंमत देऊन करावी लागत आहे. अमेरिकेने सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला तर अडचणी आणखी वाढतील.
भारतात ६० टक्के एलएनजी होर्मुझ मार्गे
एएफपी वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्टनुसार एलएनजी गॅस आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत चौथा सर्वात मोठा देश आहे. त्याचबरोबर एलपीजी आयात करणारा दुसरा सर्वात देश आहे. भारताची एलपीजीची एकूण गरज आहे, त्यापैकी ६० टक्के आयात केला जातो आणि महत्त्वाची बाब म्हणजे यातील ९० टक्के गॅस होर्मुझ खाडीतून येतो.
कतार एलएनजी उत्पादन करणारा सर्वात मोठा देश आहे. कतारने सध्या याचे उत्पादन थांबवले आहे. एलएनजी औद्योगिक वापरासाठी वापरला जातो. भारतात औद्योगिक वापरासाठीच्या एलएनजी पुरवठ्यात आधीच २० टक्के कपात करण्यात आली आहे.