भारतावरील टीका उथळ मनोवृत्तीची
By Admin | Updated: June 13, 2015 00:02 IST2015-06-13T00:02:37+5:302015-06-13T00:02:37+5:30
भारताच्या बदलत्या पवित्र्यावर पाकिस्तानी नेत्यांनी केलेली टीका, ही उथळ मनोवृत्तीची द्योतक असून, भारताच्या कोणत्याही कृतीवर पाकिस्तानने

भारतावरील टीका उथळ मनोवृत्तीची
इस्लामाबाद : भारताच्या बदलत्या पवित्र्यावर पाकिस्तानी नेत्यांनी केलेली टीका, ही उथळ मनोवृत्तीची द्योतक असून, भारताच्या कोणत्याही कृतीवर पाकिस्तानने थंड डोके ठेवून संयमपूर्वक प्रतिक्रिया दिली पाहिजे, असा सल्ला पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी आज सरकारला दिला आहे. सध्याच्या जगात पाकिस्तानच्या उथळ प्रतिक्रियेने अधिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे, असा सूर डेली टाइम्सने लावला आहे.
डेली टाइम्सने गुरुवारी पाकिस्तानी नेत्यांनी केलेल्या आगपाखडीवर अग्रलेख लिहिला असून, त्याला डेंजरस एस्कलेशन असा मथळा दिला आहे.
भारताने म्यानमारमध्ये घुसून १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्तानचीही अशीच गत होईल, असा इशारा देण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानचे नेते उफाळले व त्यांनी ‘आम्हाला म्यानमार समजू नका, आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत’, असा इशारा भारताला दिला. हे उथळ वक्तव्य आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात भारताने मदत केल्याचा उल्लेख केला म्हणून राग येत असेल आणि त्यांचे हे वक्तव्य संयुक्त राष्ट्र व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा पाकचा विचार असेल, तर या युद्धाच्या काळात पाक सैनिकांनी केलेल्या अत्याचाराच्या घटना या व्यासपीठासमोर येणार नाहीत काय? (वृत्तसंस्था)