Bangladesh India Border Tensions: बांगलादेशचे अंतरिम सरकार आजकाल अनेक आघाड्यांवर वेढलेले आहे. तशातच सरकारमध्ये अंतर्गत कलह देखील सुरू झाला आहे. अंतरिम सरकारचे गृह सल्लागार आणि निवृत्त लष्करी लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांनी एक विखारी विधान केले आहे. त्यांच्या विधानाने अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या अडचणी तर वाढल्या आहेतच, पण त्यासह भारतासोबतच्या संबंधांमध्ये पुन्हा एकदा कटुता निर्माण झाली आहे.
मंगळवारी जहांगीर आलम राजशाहीमधील तुरुंग प्रशिक्षण केंद्रात एका कार्यक्रमात पोहोचला होते. येथे पासिंग आउट परेडमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा भारत-बांगलादेश सीमेवरील अलिकडच्या तणावाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सीमेवर भारताकडून 'पुश-इन'च्या घटना खूप वाढल्या आहेत. आम्ही याचा अनेक वेळा निषेध केला आहे, जर पाठवले जाणारे लोक आमचे नागरिक असतील तर त्यांना योग्य प्रक्रियेनुसार पाठवा असे आम्ही सांगितले आहे.
'नो-मॅन्स लँड'मध्ये तणाव वाढला
भारतातील आसाम जिल्हा आणि बांगलादेशातील कुरीग्राम जिल्ह्याच्या सीमेवर परिस्थिती मंगळवारी सकाळी तापली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सीमा स्तंभ क्रमांक १०६७ जवळील बोराईबारी आणि मानकाचर भागात BSF आणि BGB आमनेसामने आले. बीएसएफ जवानांनी ९ पुरुष आणि ५ महिलांना बांगलादेशात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे, ज्याला 'पुश-इन' म्हणतात आणि याबद्दल बांगलादेशमध्ये तीव्र प्रतिक्रिया दिसून येत आहे.
सीमा पूर्णपणे सुरक्षित- सल्लागाराचा दावा
जहांगीर आलम यांनी त्यांच्या निवेदनात सीमा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले आहे की आमचे सैन्य पूर्णपणे सतर्क आहे आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. सीमेवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. अशा संवेदनशील घटनांचे वृत्तांकन करताना माध्यमांनी जबाबदारी दाखवावी असे आवाहनही त्यांनी केले.