लडाखमधील सैन्य मागे हटणार

By Admin | Updated: September 27, 2014 06:58 IST2014-09-27T06:58:26+5:302014-09-27T06:58:26+5:30

भारत व चीन यांच्यातील लडाख सीमेबाबतचा वाद मिटला असून, दोन्ही देश लडाख सीमेवरील सैन्य मागे घेत आहेत.

Army withdraws in Ladakh | लडाखमधील सैन्य मागे हटणार

लडाखमधील सैन्य मागे हटणार

न्यूयॉर्क : भारत व चीन यांच्यातील लडाख सीमेबाबतचा वाद मिटला असून, दोन्ही देश लडाख सीमेवरील सैन्य मागे घेत आहेत. सैन्य हटविण्याची प्रक्रिया २६ सप्टेंबरपासून सुरु झाली असून, ३० सप्टेंबरपर्यंत ती पूर्ण होईल. लडाख सीमा वाद सुटणे हे मोठेच यश असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.
दोन्ही देशांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला व त्यासाठी कालमर्यादाही निश्चित करण्यात आली असे सुषमा स्वराज यांनी भारतीय पत्रकारांना सांगितले. आमसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान भारत व चीन (वांग यी) यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट झाली.
पाकनेच बोलणीवर पाणी फेरले
न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानच्या विदेश सचिव पातळीवर चर्चा होण्याआधी पाकिस्तानने फुटीरवादी हुरियत नेत्यांशी बोलणी करून भारत-पाक चर्चेवर पाणी फेरले. भारतातील नव्या सरकारने नवीन संकेत दिले होते; परंतु पाकिस्तानने फुटीरवाद्यांशी बोलणी केल्याने भारताला विदेश सचिव पातळीवरील बोलणी रद्द करावी लागली, यासाठी पाकिस्तानच जबाबदार असल्याचे विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुषमा स्वराज यांनी ब्राझील, दक्षिण आफ्रिका, ब्रिक्स आणि लॅटीन अमेरिकन देशांच्या विदेश मंत्र्यांसोबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवर चर्चा केली. २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा सुरक्षा परिषदेच्या सुधारणांची प्रक्रिया २०१५ पर्यंत पूर्ण होईल, यादृष्टीने ठोस प्रयत्न केले जावेत, असेही त्या म्हणाल्या.
पाकच्या राजदूतांनी विदेश सचिव पातळीवर बोलणी होण्याआधीच हुरियत नेत्यांशी केल्याने भारताला २५ आॅगस्ट रोजीची सचिव पातळीवरील बोलणी रद्द करावी लागली. (वृत्तसंस्था)

Web Title: Army withdraws in Ladakh