Air India: काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाच्याविमानाचा अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला होता, ज्यात सुमारे ३०० लोकांना आपला जीव गमवावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे तो अपघात झाल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान, एअर इंडियाच्याविमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना नेहमी घडत राहतात. आता हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या विमानाची तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी एअर इंडियाचे विमान एआय-३१५(बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर) हाँगकाँगहून दिल्लीच्या दिशेने निघाले, परंतु टेकऑफनंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय वैमानिकाला आला, त्यानंतर मानक सुरक्षा प्रोटोकॉलनुसार वैमानिकाने मूळ ठिकाणी परतण्याचा निर्णय घेतला. अखेर विमानाचे हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग करत आले. सध्या विमानाची सुरक्षा तपासणी सुरू आहे. हाँगकाँगमध्ये विमानाचे लँडिंग झाल्यानंतर सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.