बँकॉक - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर आता आशियात आणखी २ देशांत युद्धाची परिस्थिती तयार झाली आहे. या दोन्ही देशांनी आपापल्या सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य तैनात केले आहे. थायलँड आणि कंबोडिया या दोन्ही देशात तणावाची स्थिती आहे. कंबोडियासोबत सीमावादाच्या पार्श्वभूमीवर थायलँडने सैनिकांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे पूर्व आशियात होणाऱ्या शांततेच्या प्रयत्नांना फटका बसण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशांचेही चीनसोबत द्विपक्षीय संबंध आहेत. सध्या दक्षिण पूर्व आशियात मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम शांततेचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यात यश मिळाले नाही.
थायलँड आणि कंबोडियात तणाव का वाढला?
२८ मे रोजी अनिश्चित सीमा रेषेवर झालेल्या झटापटीत एक कंबोडियन सैनिक मारला गेला तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अनेक दिवसांपासून दोन्ही देशांसोबत दक्षिण पूर्व आशियातील सरकार शांततेचा प्रयत्न करत आहेत. परंतु थायलँडचे उपपंतप्रधान फुमथम वेचायाचाईने यांनी म्हटलं की, कंबोडियाने गुरुवारी द्विपक्षीय चर्चेबाबत आमचा प्रस्ताव फेटाळून लावला. या प्रस्तावामुळे तणाव कमी होऊ शकला असता असं त्यांनी सांगितले.
तसेच कंबोडियाने सीमेवर सैन्य वाढवले आहे त्यातून सीमावाद आणखी वाढला आहे. त्यामुळे थाई सरकारनेही उपाययोजना लागू करत सैन्य मजूबत करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. कंबोडियन सैनिक आणि नागरिक वारंवार थायलँडमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. हा उकसवण्याचा आणि सैन्याचा वापर करण्यास भाग पाडण्याचा प्रकार आहे. कंबोडिया सीमेवरील सर्व थाई चौक्यांवर गस्त वाढवण्यात आली आहे असंही फुमथम यांनी म्हटलं.
दरम्यान, आमची भूमिका संघर्ष सुरू करण्याची नाही तर स्वत:चा बचाव करण्याची आहे. जागतिक कायद्याचे पालन केले जाईल. आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी धोरणे अत्यंत महत्त्वाची आहेत. सशस्त्र बल आक्रमणाविरोधात बचावासाठी तयार आहे असं विधान कंबोडियन पंतप्रधान हुन मानेट यांनी शनिवारी केलेल्या भाषणात केले.
थायलँड आणि कंबोडियात सीमावाद काय?
थायलँड आणि कंबोडिया यांच्यात ८१७ किमी लांब जमिनी सीमा आहे. दोन्ही देशांत शतकाहून अधिक काळ सीमेवरील अनिश्चित रेषेवरून वाद सुरू आहे. ही सीमा पहिल्यांदा १९०७ मध्ये फ्रान्सने नकाशावर रेखाटली होती, जेव्हा कंबोडियात त्यांची वसाहत होती. २००८ मध्येही दोन्ही देशात ११ शतकापासून असलेल्या एका हिंदू मंदिरावरून वाद झाला होता. ज्यामुळे अनेकदा संघर्ष झाला अनेक लोक मारले गेले. २०११ मध्येही एक आठवडा दोन्ही देशात गोळीबार सुरू होता.
कंबोडिया जागतिक कोर्टाचे दरवाजे ठोठावणार
सीमेवरील ४ हिस्स्यांच्या वादाचा मुद्दा जागतिक कोर्टाकडे नेणार, त्याला थायलँडने सहकार्य करावे असं कंबोडियाने अलीकडे म्हटलं. तर थायलँड न्यायालयाच्या क्षेत्राला मान्यता देत नाही. सीमेबाबत जो वाद असेल तो द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून सोडवला जाईल असं फुमथम यांनी सांगितले.