उष्णतेच्या लाटेने कराचीत ७०० ठार
By Admin | Updated: June 24, 2015 00:18 IST2015-06-24T00:18:04+5:302015-06-24T00:18:04+5:30
पाकिस्तानला दशकातील तीव्र उष्णतेच्या लाटेने तडाखा दिला असून, सिंध प्रांताची राजधानी असणाऱ्या कराची शहरात या लाटेने सुमारे ७०० बळी घेतले आहेत.

उष्णतेच्या लाटेने कराचीत ७०० ठार
कराची : पाकिस्तानला दशकातील तीव्र उष्णतेच्या लाटेने तडाखा दिला असून, सिंध प्रांताची राजधानी असणाऱ्या कराची शहरात या लाटेने सुमारे ७०० बळी घेतले आहेत. उष्णतेच्या कहरामुळे शहरातील सर्व शाळा व सरकारी कार्यालये बंद करण्यात आली असून या नैसर्गिक संकटाशी लढण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
ही उष्णतेची लाट सिंध प्रांतात आहे. रमजान सुरू झाला तेव्हापासून म्हणजेच शुक्रवारपासून उष्णतेचा पारा वाढताना दिसत आहे. उष्णतेमुळे शहरातील सर्व रुग्णालयांत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कराची शहरात सर्वाधिक बळी गेले असून मृतांचा आकडा ७०० पर्यंत पोहोचला आहे. सिंध प्रांतातील इतर गावेही या लाटेत होरपळली आहेत.
सोमवारी रात्रीपर्यंत शहरातील तीन रुग्णालयातील मृतांचा आकडा ३४१ होता, पण नंतर मृतांची रांगच लागली असून, मृतांचा आकडा ७०० पर्यंत पोहोचला आहे.
कराचीत शुक्रवारपासून तापमान ४४ ते ४५ अंश सें.ग्रे. पर्यंत जात आहे. मंगळवारी संध्याकाळी उष्ण हवेला उतार पडेल असे हवामान कार्यालयातर्फे सांगितले जात आहे. सोमवार संध्याकाळपासून उष्णतेमुळे २०० जण मरण पावले आहेत, असे जिना रुग्णालयाच्या अधीक्षिका सीमी जमाली यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांत उष्णतेचे विकार झालेले ३ हजार रुग्ण दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार होत आहेत, असे जमाली म्हणाल्या.
अब्बासी शहीद रुग्णालयात ७१ लोक उष्णतेमुळे मरण पावले असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मरणारांची संख्या ७० आहे. पाकिस्तान लष्कर व निमलष्करानेही उष्णतेमुळे आजारी असलेल्या लोकांवर उपचारासाठी विशेष केंद्रे सुरू केली आहेत. तसेच सरकारी रुग्णालयांना औषधाचा पुरवठा केला आहे. दरम्यान, भारतामध्येही यंदाच्या उन्हाळ्यात उष्णता लाटेने सुमारे २ हजार बळी गेले. (वृत्तसंस्था)