नवी दिल्ली - जर तुमच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर कुठलीही आव्हाने तुम्हाला रोखू शकत नाहीत. श्रीनाथ के या व्यक्तीची कहाणी अशीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. गरिबी आणि संघर्षमय आयुष्य जगताना त्यांनी कधी हार मानली नाही. रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून करत असताना स्टेशनवर मिळणाऱ्या फ्री वाय-फायचा सदुपयोग करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि UPSC परीक्षा उत्तीर्ण होत IAS बनले.
श्रीनाथ हे केरळच्या मुन्नार येथील रहिवासी आहेत. एखाद्याने परिस्थितीशी लढायचं ठरवले तर यशही त्याच्या पदरी पडतेच हे श्रीनाथ यांच्याकडे पाहून कळेल. कुटुंबात एकमेव कमावते सदस्य असलेले श्रीनाथ एर्नाकुलम येथे कुलीचे काम करत होते. दिवसाला ४००-५०० रुपये मजुरी मिळायची. डोक्यावर दुसऱ्याचं ओझं घेऊन चालायचे, त्यातून कशीबशी कमाई व्हायची. या संघर्षमय प्रवासात त्यांनी नागरी सेवा करत देशाची सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगले होते.
श्रीनाथ यांची यशोगाथा इतरांपेक्षा वेगळी आहे. ना त्यांनी महागडी पुस्तके खरेदी केली, ना एखाद्या कोचिंग क्लासला जात शिक्षण घेतले. रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या फ्री वाय-फाय इंटरनेटचा आधार त्यांनी अभ्यासासाठी घेतला. त्यांच्याकडे इतके पैसेही नव्हते ते कोचिंग सेंटरला जाऊ शकतील परंतु कधीही हार न मानता त्यांनी आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण करायचेच हे ठरवून टाकले होते. २०१६ साली रेलटेल आणि गुगलने भारतातील अनेक रेल्वे स्टेशनवर मुफ्त वाय-फाय सेवा सुरू केली होती. श्रीनाथ त्यावेळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर काम करत होते. फ्री वाय-फायमधून त्यांनी ऑडिओ बुक, व्हिडिओ डाऊनलोड केले. कुलीचं काम करत करत त्यांनी अभ्यासही सुरूच ठेवला. व्हिडिओच्या माध्यमातून ते ऑनलाईन लेक्चर पाहत होते.
श्रीनाथ यांचा आयएएस बनण्याचा प्रवास इतका सहज सोपा नव्हता. त्यांनी बऱ्याचदा यूपीएससी परीक्षा दिली परंतु यश मिळाले नाही. अखेर श्रीनाथ यांच्या मेहनतीला फळ मिळाले. चौथ्या प्रयत्नात त्यांना चांगली रँक मिळत यूपीएससी परीक्षेत पास झाले. रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करणारे श्रीनाथ के आपल्या अढळ दृढनिश्चय आणि चिकाटीने भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी झाले. आज ते अशा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत जे अथक प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने निराश होतात. कुठलीही आव्हाने तुमच्या यश थांबवू शकत नाही. फक्त काहीतरी करून दाखवण्याची जिद्द कायम ठेवली पाहिजे.