हिंगोली : जिल्ह्यातील आधार केंद्रांची संख्या कमी झाली आहे. याचा भार उपलब्ध केंद्रांवर येत असल्याने आधार केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात तर किमान दोन दिवस तरी लागत आहेत. त्यामुळे आधार केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
शासकीय, निमशासकीय कामांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे कागदपत्र ठरत आहे. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाने आधार कार्ड काढली आहेत. मात्र यापूर्वी आधार कार्ड काढणारे बहुतांश कर्मचारी अप्रशिक्षित होते. त्यांच्या हातून नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल नंबर नोंदविताना अनेक चुका राहून गेल्या. आता प्रत्येक योजनेसाठी आधार क्रमांक जोडले जात आहे. त्यामुळे नाव, पत्ता, जन्मतारीख आदींची माहिती जुळत नसल्याने योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. आता तर रेशन कार्डलाही आधार जोडले जाणार असल्याने नागरिक आधार कार्ड दुरुस्तीसाठी आधार केंद्र गाठत आहेत. मात्र आधार केंद्रांची संख्या अत्यंत तोकडी असल्याने नागरिकांना अनेक तास ताटकळत थांबावे लागत आहे. ग्रामीण भागातील मोठ्या गावात, शहरात आधार केंद्र न देता अडचणीचे ठरेल अशा गावांत आधार केंद्र दिल्याने दिवसभर थांबूनही आधार कार्डातील दुरुस्ती होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र, पोस्ट कार्यालय व बँकांत केंद्र देण्यात आले आहेत. मात्र यातील बहुतांश आधार केंद्र बंद असल्याने केवळ मोजकेच आधार केंद्र सुरू असल्याचे बोलले जात आहे. यातही महा-ई-सेवा केंद्रामार्फत चालणाऱ्या अधार केंद्रावर नाव दुरुस्तीसाठी चक्क १०० रुपये फी आकारली जात आहे. त्यामुळे एकप्रकारे ही लुटीची केंद्रच बनली आहेत.
का करावे लागते आधार नूतनीकरण
आधार कार्ड काढताना अनेकवेळा नाव, पत्ता, जन्मतारखेत चुका होत आहेत. तसेच आता अनेकांनी मोबाइल नंबर बदललेला असतो. प्रत्येक योजना, कागदपत्रांना आधार नंबर लिंक केला जात आहे. आधार कार्डमध्ये चुका असल्यास आधार लिंक होत नाही. त्यामुळे आधार कार्डाचे नूतनीकरण करणे आवश्यक बनले आहे.
जवळपास प्रत्येक गावात महा-ई-सेवा केंद्र देण्यात आले आहे. यातील काही महा-ई-सेवा केंद्रामार्फत आधार केंद्र चालविले जातात. मात्र आखाडा बाळापूरसारख्या मोठ्या शहरात आधार केंद्र नाही. त्यामुळे कामठा फाटा येथे जावे लागत आहे. यात वेळ व पैसा खर्च होत आहे.
- राष्ट्रपाल ढेपे
जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रामार्फत चालणाऱ्या आधार केंद्रांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे मोठ्या गावातही आधार केंद्र सुरू करावेत. अनेकवेळा बोटाचे ठसे जुळत नसल्याने काही दिवसांनी या असे म्हणून परत पाठविले जात आहे. आधार केंद्रांची संख्या वाढवावी.
-हरिष खिल्लारी
कोणाचे किती केंद्र
जिल्हा प्रशासन ८०
बँका - ४
पोस्ट ऑफिस : ०१