उद्योगांचे चाक मंदावले : कंपन्यांना माणसे अन् कामगारांना काम मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST2021-05-10T04:29:40+5:302021-05-10T04:29:40+5:30

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन सुरू केले आहे. अनेक क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातून औद्योगिक ...

The wheel of industry slowed down: companies did not get jobs for people and workers! | उद्योगांचे चाक मंदावले : कंपन्यांना माणसे अन् कामगारांना काम मिळेना !

उद्योगांचे चाक मंदावले : कंपन्यांना माणसे अन् कामगारांना काम मिळेना !

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन सुरू केले आहे. अनेक क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातून औद्योगिक क्षेत्राला मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुरूही झाल्या आहेत. मात्र कंपनीला पुरविला जाणारा कच्चा माल आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच एखाद्या मशीनचा पार्ट बदलायचा म्हटला तरी इतर दुकाने बंद असल्याने मोठी अडचण येत आहे. त्यामुळे कंपनी बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर येत आहे. काही कंपन्यांनी उत्पादन सुरू ठेवले असले तरी बाहेर मालाला उठाव नसल्याने मालाचे उत्पादन तरी कशाला करायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय ठप्प पडला आहे. एकीकडे उद्योग ठप्प पडत असताना दुसरीकडे मात्र मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक मजुरांच्या हाताला काम नसल्याने हतबल झाले आहेत.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती सुरू उद्योग

हिंगोली -३५

वसमत - १२

कळमनुरी - २

उद्योजकांच्या प्रतिक्रिया

ब्रेक द चेनमध्ये औद्योगिक वसाहती सुरू असल्या तरी उत्पादित मालाला बाहेर उठाव नाही. त्यात कच्चा माल आणताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडले आहेत. कामगारांनाही काम मिळत नाही. मालाची विक्री होत नसतानाही बँक मात्र हप्ते भरण्यासाठी तगादा लावत आहे.

- रमेश पंडीत, उद्योजक

औद्योगिक वसाहती सुरू रहाव्यात, यासाठी शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. मात्र ब्रेक द चेनमुळे बाजारपेठेत बंधने आहेत. कंपनीतील मशीनचा एखादा पार्ट आणायचा असला तरी बाजारपेठ बंद असल्याने आणता येत नाही. कच्चा मालही आणताना अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. याचा फटका कामगारांनाही बसत आहे.

-आर. एस. केदार,

उपअभियंता, एमआयडीसी, उपविभाग परभणी

कच्चा माल मिळण्यात अडचणी

हिंगोली जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योग फार मोठे नाहीत. त्यामुळे माल उत्पादित करण्यासाठी कच्चा माल इतर जिल्ह्यातून मागवावा लागतो. शिवाय मशीनचे पार्टही येथे मिळत नाहीत. कच्चा माल मिळाला तरी आणायचा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या बहुतांश मोठ्या शहरात ब्रेक द चेनमुळे संचारबंदी लागू आहे. यामुळेच अडचणीत भर पडत आहे.

कामगारांच्या प्रतिक्रिया

औद्योगिक वसाहत सुरू असली तरी बहुतांश उद्योग ठप्प पडले आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कंपन्या सुरू असल्या तरी तेथे पोहचायचे कसे? ये-जा कशी करायची ?

-अंकुश पंडित

शासनाने औद्योगिक वसाहत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र कच्चा माल मिळत नसल्याने कंपनी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परिणामी मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

-अरुण वाढवे

Web Title: The wheel of industry slowed down: companies did not get jobs for people and workers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.