आठवडे बाजार सुसाट ; ना मास्क,ना सोशल डिस्टन्सिंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:31+5:302021-06-19T04:20:31+5:30
हिंगोली : आठवडे बाजार भरविण्यासंदर्भात कोणतीही सूचना नसताना जिल्ह्यातील काही भागांमध्ये आठवडे बाजार सर्रासपणे भरविला जात आहे. बाजारकरू व ...

आठवडे बाजार सुसाट ; ना मास्क,ना सोशल डिस्टन्सिंग !
हिंगोली : आठवडे बाजार भरविण्यासंदर्भात कोणतीही सूचना नसताना जिल्ह्यातील काही भागांमध्ये आठवडे बाजार सर्रासपणे भरविला जात आहे. बाजारकरू व विक्रेते मास्क विनाच फिरताना आढळून येत आहेत.
कोरोना महामारी ओसरत चाललेली पाहून राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने अनलॉक केले आहे. परंतु, आठवडे बाजाराला काही परवानगी दिलेली नाही. राज्य शासनाची आठवडे बाजार सुरु करण्यासंदर्भात सूचना आल्यास बाजार सुरु करण्यात येईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. परंतु, दुसरीकडे परवानगी नसतानाही जिल्ह्यातील काही ठिकाणी मात्र आठवडे बाजार सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोना ओसरत चालल्याचे पाहून बाजारात आलेले काही नागरिक मास्कही घालत नसल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कटलरी व भाजीपाला विक्रेतेही मास्क न घालताच मालाची विक्री करीत आहेत. कोरोना महामारीने अनेकांची बळी घेतलेले असतानाही या विक्रेत्यांना कशी काय कोरोना महामारीची भीती वाटत नाही? हाही मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी आठवडे बाजारात तर मास्क सोडा साधी दस्ती ही कोणीही बांधलेली आढळून येत नाही. कळमनुरी तालुक्यातील बोल्डा या गावात शुक्रवारी आठवडे बाजार भरला त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्याचे पहायला ही मिळाले. सामाजिक अंतराचा याठिकाणी बोजवारा उडाला होता.
बॉक्स/ प्रतिक्रिया
फिजिकल डिस्टन्सिंग वाऱ्यावर
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विना परवानगी आठवडे बाजार भरविले जात आहेत. बाजारात विक्रेत्यांना तसेच बाजारकरूंना सामाजिक अंतर काय असते याचेही भान राहिलेले दिसून येत नाही. भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी अनेकजण गर्दी करु लागले आहेत. कोरोनाची भीती तर कोणालाच वाटत नाही.
जवळ जवळ दुकाने थाटले
कोरोना महामारी ओसरत चालली आहे. संपलेली नाही, हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. बाजारपेठेत तर अनेक दुकानदारांनी जवळजवळ दुकाने थाटल्याचे पहायला मिळाले. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक असताना कोणाच्याही तोंडाला मास्क लावलेला दिसत नाही.
कोरोनाची भीती राहिली नाही
कोरोना ओसरु लागल्याचे पाहून अनेकजण आठवडे बाजार व बाजारपेठेत फिरताना पहायला मिळत आहेत. जिल्हा प्रशासनाने बाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक केले असतानाही बाजारात मात्र मास्क न लावता अनेकजण फिरताना आढळून येत होते. कोरोनाची भीती कशी काय वाटत नाही, हाही मोठा प्रश्न आहे.
विक्रेतेही बेफिकीर
आठवडे बाजाराला परवानगी नसतानाही अनेक ठिकाणी आठवडे बाजार बिनधास्तपणे भरविले जात आहेत. बाजारात वस्तूंची विक्री करताना विक्रेत्यांनी मास्क घालणे बंधनकारक असतानाही विक्रेते बेफिकीर दिसत आहेत. विक्रेते हे अर्धवट दस्ती बांधून आपल्या मालाची विक्री करीत असल्याचे पहायला मिळत आहेत.
प्रतिक्रिया
शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सद्यस्थितीत अनलाॅक केले आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी कोरोना नियम पाळण्याची सूचनाही जिल्हा प्रशासनाने आदेशात नमूद केली आहे. परंतु, हिंगोली जिल्ह्यामध्ये आठवडे बाजाराला कोणत्याही प्रकारची परवनगी दिलेली नाही.
-रोहित कंजे
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
फोटो