संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST2021-03-01T04:33:50+5:302021-03-01T04:33:50+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने १ मार्चपासून सात दिवस टाळेबंदी जाहीर केली ...

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचे भाव कडाडले
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने १ मार्चपासून सात दिवस टाळेबंदी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील भाजीपाला बाजारात भाजीपाल्यांचे भाव कडाडलेले हाेते. प्रत्येकी किलाेमागे १५ ते २० रुपयांनी वाढ झाली हाेती.
दोन-तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात पालेभाज्यांची आवक वाढली होती. त्यामुळे पालेभाज्यांचे भावही उतरले होते. परंतु, रविवारी मात्र भाज्यांची आवक होऊनही संचारबंदीमुळे भाजीपाल्यांचे भाव कडाडले हाेते. १ मार्चपासून टाळेबंदी असल्याने भाजीपाला मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. यामुळे अनेकांनी पुढील आठ दिवस पुरले एवढा भाजीपाला खरेदी केला आहे.
रविवारच्या बाजारात टमाटा २५ रुपये किलो, भेंडी ४०, कोबी २०, हिरवी मिरची ४०, वांगे २०, चवळी ४०, आद्रक ३०, कोथिंबीर ४०, आलू ४०, कारले ४०, दोडके ४०, गवार ४० रुपये किलोप्रमाणे विक्री केले जात होते.
तसेच यादिवशी भाजीबाजारात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणात होती. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भाजीबाजारात मात्र सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. सात दिवस भाजी मिळतेच की नाही याची चिंता अनेकांना हाेती.
किराणा बाजारातील चढउतार
शहरातील किराणा बाजारात वस्तूची चढ-उतार पहायला मिळाली. १२० रुपये किलो मिळणारे सोयाबीन तेल १३५ रुपयाला विक्री केले. शेंगदाणा तेलाचा भाव १५५ रुपये होता. तेल व इतर किराणा मालाची आवक कमी-जास्त असल्याने भाव वाढल्याचे प्रशांत गुंडेवार यांनी सांगितले.