दोन दिवसांत ३० बसेस १८०० कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ दीड लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST2021-04-12T04:27:18+5:302021-04-12T04:27:18+5:30
हिंगोली : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शनिवार व रविवारला कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात एस.टी. बसेसला परवानगी ...

दोन दिवसांत ३० बसेस १८०० कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ दीड लाख!
हिंगोली : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शनिवार व रविवारला कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात एस.टी. बसेसला परवानगी असली तरी प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. हिंगोली आगाराला दोन दिवसांत ४६ फेऱ्यांमधून केवळ १ लाख ४० हजार रुपयेच हाती आले आहेत. या दोन दिवसांत ८ लाखांच्या नुकसानीचा फटकाही बसला आहे.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. बाजारपेठ बंद असली तरी या काळात एस.टी. बसेस सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी एस.टी. आगार बसेस सोडत असले तरी लॉकडाऊनमुळे प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. हिंगोली आगाराला दरवर्षी लग्नसराईकाळात जवळपास दररोज सात लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, कोरोनाच्या काळात यात घट होत आगाराचे उत्पन्न दर दिवशी ४ लाखांवर आले. त्यात शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन केले जात असल्याने उत्पन्नात आखणी घट झाली आहे. सध्या सेनगाव, रिसोड, झिरो फाटा, अकोला, नांदेडपर्यंत बसेस सोडल्या जात आहेत.
आगारातील एकूण बसेसची संख्या - ५८
दोन दिवसांत धावलेल्या बसेस - ३०
फेऱ्या झाल्या आगारामध्ये -४६
पैसे मिळाले दोन दिवसांत - १ लाख ४० हजार
दोन दिवसांत ८ लाखांचा तोटा
हिंगोली आगारातून शनिवारी १५ तसेच रविवारीही १५ बसेस सोडण्यात आल्या. दोन दिवसांत १८०० कि.मी. बसेस धावल्या. त्यातून शनिवारी ७० हजार तर रविवारी ७० हजारांचे उत्पन्न हाती पडले. हिंगोली आगाराला दोन दिवसांत तब्बल ८ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. लग्नसराईकाळात हिंगोली आगाराचे उत्पन्न ७ लाख रुपयांपर्यंत जात होते.
रोटेशनप्रमाणे कर्मचारी कामावर
१) हिंगोली आगारात १२१ वाहक तर १२१ चालक कार्यरत आहेत. सध्या कोरोनामुळे बसेसच्या फेऱ्या घटल्या आहेत. त्यात शनिवार व रविवारी मोजक्याच फेऱ्या होत असल्याने यावर कर्मचारीही मोजकेच नियुक्त केले जात आहेत.
२) कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी त्यांना रोटेशन पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जात असल्याची माहिती आगारातून देण्यात आली.
स्थानकप्रमुखाचा कोट
कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली तरी प्रवासी असलेल्या मार्गावरील सेनगाव, रिसोड, नांदेड, झिरोफाटा पर्यंत बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करावे, तोंडाला मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करावा.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली