महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:17+5:302021-05-14T04:29:17+5:30
हिंगोली : महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये २० ते ३० टक्के कपात करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा ...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करावी
हिंगोली : महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये २० ते ३० टक्के कपात करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
१३ मे रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष करण भन्साळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. कोरोना महामारीच्या काळात जास्त प्रमाणात लॉकडाऊन हे महाराष्ट्रात झाले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मधील तीन ते चार महिन्यांचे व शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१मधील संपूर्ण वर्षाचे अभ्यासक्रम हे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. विद्यार्थ्यांना ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा, संगणक लॅब अशा अनेक शैक्षणिक सुविधांचे लाभ मिळालेले नाहीत. मुंबईसह राज्यातील अनेक महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्कात कपात केली नाही. सर्वोच्च न्यायालयाने शाळांचे शैक्षणिक शुल्क १५ टक्के कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी २०, ३० टक्के शुल्क कपात करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
राज्यातील अनेक महाविद्यालयांकडून संपूर्ण शुल्क भरण्यासाठी दबाव आणला जातोय. शुल्क भरा अन्यथा अंतर्गत गुण मिळणार नाहीत तसेच परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असेही सांगितले जाते. अशा प्रकारे महाविद्यालयांची मनमानी सुरू आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फाेटाे नं.२३