जिल्ह्यात कोरोना काळात १४८ कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST2021-02-23T04:45:53+5:302021-02-23T04:45:53+5:30

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्राचा कुपोषित बालकांना चांगलाच आधार होत आहे. राज्यात कोरोना काळात दाेन ...

Treatment of 148 malnourished people in the district during Corona period | जिल्ह्यात कोरोना काळात १४८ कुपोषितांवर उपचार

जिल्ह्यात कोरोना काळात १४८ कुपोषितांवर उपचार

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्राचा कुपोषित बालकांना चांगलाच आधार होत आहे. राज्यात कोरोना काळात दाेन पोषण पुनर्वसन केंद्रा सुरू होते. त्यात हिंगोलीच्या केंद्राचा समावेश होता. त्यामुळेच कोरोना काळातही हिंगोली केंद्रात १४८ बालकांवर उपचार करण्यात डॉक्टर यशस्वी ठरले आहेत.

वय व उंचीच्या तुलनेत वजन कमी असणाऱ्या ० ते ५ वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांना योग्य उपचार मिळावेत यासाठी येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तीव्र कुपोषित बालकांना १४ दिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात येते. बालकांचे वजन वाढावे, यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ बनवून दिले जातात. सर्व उपचार मोफत असून मातेला दररोज १०० रूपये प्रमाणे १४ दिवस बुडीत मजूरी दिली जाते. येथील केंद्रात आतापर्यंत ७६३ कुपोषित बालकांना दाखल करण्यात आले होते. कोरोना काळात एकाही खाजगी दवाखान्यात रूग्णांना उभे केले जात नव्हते. तसेच शासकीय रूग्णालयातही उपचारासाठी रूग्ण धजावत नव्हते. अशातही येथील पोषण पुनर्वसन केंद्राने पुढाकार घेत कुपोषित बालकांवर उपचार केले. त्यामुळेच कोरोनाच्या काळात तब्बल १४८ बालकांची काळजी घेण्यात डॉक्टरांना यश आले. काही बालकांना त्यांच्या घरी जाऊन पोषण आहार खाऊ घातल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे या काळात राज्यात दोनच केंद्र सुरू होते. त्यात हिंगोलीच्या केंद्राचा समावेश होता. दरम्यान, २०१५ पासून आतापर्यंत या केंद्रामध्ये ७६३ कुपोषित बालके उपचारासाठी दाखल झाले होते. यात ३४३ मुले तर ४२० मुलींचा समावेश होता.

पाच वर्षात ६६१ बालके कुपोषणमुक्त

येथील जिल्हा रूग्णालयात स्थापन झालेल्या पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये आतापर्यंत ७६३ कुपोषित बालके उपचारासाठी दाखल झाले होते. दाखल झालेल्या काही बालकांना इतरही गंभीर आजार असल्याने त्यातील १९ बालकांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. त्यामुळे येथील केंद्रामध्ये आतापर्यंत ६६१ बालकांवर उपचार करून त्यांना कुपोषणमुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले.

येथील पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल होणाऱ्या कुपोषित बालकांची योग्य काळजी घेतली जाते. बालकाचे वजन वाढावे यासाठी पोष्टीक आहारासह सर्व सुविधा मोफत दिल्या जातात. तसेच मातांना बुडीत मजुरी दिली जाते. कोरोना काळातही बालकांवर उपचार करण्यात आले.

- डॉ. दीपक मोरे,

बालरोग तज्ञ तथा विभागप्रमुख

बालरोग शास्त्र व नवजात शिशु कक्ष

कोणत्या वर्षात किती कुपोषितांवर उपचार

२०१६ - ४०

२०१७ - १५७

२०१८ -१६४

२०१९ -२३५

२०२० -१४८

Web Title: Treatment of 148 malnourished people in the district during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.