ग्रामीण भागातील प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST2021-01-22T04:27:18+5:302021-01-22T04:27:18+5:30
कोरोनाने थांबविल्या फेऱ्या: अपुरे मनुष्यबळाचाही फटका हिंगोली: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. ...

ग्रामीण भागातील प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत
कोरोनाने थांबविल्या फेऱ्या: अपुरे मनुष्यबळाचाही फटका
हिंगोली: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. ग्रामीण भागातील प्रवाशांची मदार तर अवैध प्रवासी वाहतुकीवरच आहे. त्यातही एसटी आगाराकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने याचाही परिणाम बसफेऱ्या सोडण्यावर होत आहे.
कोरोना संसर्ग आजाराने संपूर्ण जग हातबल झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्याही आतापर्यंत ३ हजार ६६० वर पोचली आहे. लॉकडाउनमुळे तर जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. या काळात तर सर्वच कर्मचाऱ्यांना कामाअभावी घरी बसून रहावे लागले. आता कुठे शासनाने काही नियम शिथील केल्याने प्रमुख मार्गावर बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. हिंगोली आगारातून नांदेड, वाशीम, अकोला, परभणीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसेस सोडण्यात येत आहेत. मोठ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली असली तरी अद्याप ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. हिंगोली आगारातून सध्या सेनगाव, रिसोड, खानापूर, सावरगाव आदी मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत. तर जांभरून मार्गावर २२ जानेवारीपासून बस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील काही मार्गावर बसफेऱ्या सुरू केल्या असल्या तरी अद्याप अनेक मार्गावरील प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा आहे.
३२ कर्मचारी बेस्टसाठी रवाना
हिंगोली येथील एसटी आगारासाठी १२० वाहक तर १२० चालक राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टमध्ये कर्मचारी संख्या कमी असल्याने हिंगोली आगारातील प्रत्येकी १६ वाहक, चालकांना मुंबईला बेस्टमध्ये पाठविले आहेत. त्यामुळे हिंगोली आगारामध्ये मष्युबळाची कमतरता जाणवत आहे. याचा परिमाण बसफेऱ्या सोडण्यावरही होत आहे.
२१ बसेस मानव विकाससाठी
हिंगोली आगाराकडे जवळपास ५८ बसेस उपलब्ध आहेत. १० जानेवारीपासून १० बसेस बेस्टसाठी पाठविण्यात आल्या आहेत. आता केवळ ४८ बसेस शिल्लक आहेत. पूर्वी जवळपास १४ फेऱ्या ग्रामीण भागात होत होत्या. मात्र सध्या केवळ पाच ते सहा मार्गावरच फेऱ्या सोडण्यात येत आहेत. यातील २१ बसेस मानव विकास अंतर्गत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येतात. शाळा सुरू नसल्या तरी सध्या विद्यार्थ्यांना पास देण्यात येत असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.